दि. 19 पासून ‘सरकार तुमच्या दारी’ : मुख्यमंत्री सावंत
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यांना आवश्यक असणारी सर्व साधने मोफत पुरवठय़ावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शिवाय ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रमही रविवार दि. 19 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय स्कूल – पर्वरी येथे व्हिल चेअर्सच्या वितरण कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, दिव्यांग मागे राहाणार नाही आणि त्याची आबाळ होणार नाही याची काळजी सरकार घेणार असून त्यांना असलेल्या सर्व सवलती देण्यात येतील, असे डॉ. सावंत म्हणाले. तसेच त्यांना हवी असलेली सर्व उपकरणे दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना आणि लसीकरण याबाबत कोणी राजकारण करु नये. राजकारणासाठी इतर अनेक विषय आहेत. लोकांनी लसी घ्याव्यात म्हणून सर्व पक्षांनी राजकारण न करता प्रयत्न करावेत. लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे व पुढे आणावे. कोरोनावरील लसीकरण महत्त्वाचे असून ते सर्वांनी करुन घ्यावे. त्यासाठी मानसिकता बदला असेही त्यांनी नमूद केले.