प्रतिनिधी/ पणजी
रेती, खडी आणि चिरे व दगड काढण्यासाठी खाण खात्याकडून परवाना घेण्यासंबंधी आवश्यक ते नियम खाण खात्याने तयार केले आहेत. त्यात परवाना मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली असून गोव्याबाहेरुनही सदर माल आणण्यास मान्यता दिली आहे. खाण खात्याचे संयुक्त सचिव आय. ए. एस. अधिकारी विवेक एच. पी. यांनी जारी केलेल्या या आदेशामुळे रेती व्यावसायिकांची समस्या सुटणार आहे.
खाण व खनिज (विकास व नियमन) कायदा 1957 प्रमाणे खाण खात्याकडून परवाना घेतल्याशिवाय रेती, खडी, लोबर व चिरे या सारखे दुय्यम खनिज काढता येत नाही. परवाना देण्यासाठी गोवा सरकारने 1985 साली नियम केले होते. ते जाचक असल्यामुळे परवाना न घेताच सदर व्यवसाय चालायचे.
आता खाण खात्याने त्या नियमात दुरुस्ती करुन ही नवी अधिसूचना जारी केली आहे. हा व्यवसाय करणाऱयांनी खाण खात्याकडे रितसर अर्ज करुन आवश्यक ती फी भरुन परवाना घेणे आवश्यक आहे. अर्जासोबत खाणीचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. या व्यावसायिकांनी 60 दिवसांच्या आत आराखडा सादर करण्याचे त्यात म्हटले आहे.
कलम 5 (ए) महत्त्वाचे
या नियमाच्या कलम 5 (ए) प्रमाणे जर खाण खात्याच्या अधिकाऱयाने या आराखडय़ाला मान्यता दिली नाही व परवाना देण्यास टाळाटाळ केली आणि ठराविक कालावधीत परवाना न मिळाल्यास सदर व्यावसायिकाला परवाना नसताना व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचे त्यात म्हटले आहे.
गोव्याबाहेरुनही आणता येते दुय्यम खनिज
गोव्याच्या चेक नाक्यावर प्रत्येक ट्रक मागे 500 रुपये भरुन दुय्यम खनिज गोव्यात आणण्यास मान्यता देण्यात आली आहे. ट्रक जर सहा चाकांपेक्षा मोठा असल्यास 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत. संबंधित अधिकाऱयांकडून आगावू परमिट घेणे आवश्यक आहे. या परमिटची एक प्रत अर्जदाराला मिळेल दुसरी चेकपोस्टला पाठवली जाईल. तिसरी इन्स्पेक्टींग ऑफिसरला तर चौथी खाण संचालकांना सादर केली जाईल. पाचवी प्रत त्या संबंधित अधिकाऱयाकडे राहील. अर्जदाराने आपले परमिट चेक नाक्यावर दाखवून गोव्यात प्रवेश करण्यासाठी ट्रान्झीट पास घ्यावा. तो फक्त त्या दिवसासाठीच उपयुक्त ठरणार आहे.
कारवाई केल्यास चार महिने खाण बंद
दुय्यम खनिज खाण चालविण्यासाठी जे नियम केले आहेत त्या नियमाचे पालन न झाल्याचे आढळल्यास त्या खाणीवर कारवाई करुन खाण बंद केली जाऊ शकते व अशा पद्धतीने कारवाई करुन खाण बंद पाडल्यास चार महिन्यानंतर सदर खाण चालविण्यास मान्यता दिली जाणार आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश
रेती व्यावसायिकांना परवाने देण्यासंबंधी नियम कधी केले जाणार याची विचारणा गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने केली होती. जोपर्यंत परवाने मिळत नाहीत तोपर्यंत सदर बेकायदेशीर दुय्यम खनिज व्यवसाय चालणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेशही यापूर्वी न्यायालयाने दिला होता.
दोन महिन्यांची मुदत
रेती व इतर दुय्यम खनिज व्यावसायिकांना परवान्यासाठी अर्ज करण्यास दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या अर्जासोबत त्यांनी खाणीचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसाच्या आत परवाना जारी केला जाईल किंवा अर्ज फेटाळला जाईल ही मुदत उघड केलेली नाही. परवाना मुदतीच्या आत न दिल्यास मात्र बेकायदेशीर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.