खानापूरचे पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली खासदार अनंतकुमार हेगडे यांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील रस्ते विकासाच्या कामात वनखात्याकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. यामुळे तालुक्यातील बऱयाच गावांना बारमाही रस्ते नसल्यामुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे दुर्गम भागातील रस्ते विकासात होत असलेला वनखात्याचा अडसर स्वतः लक्ष घालून दूर करावा, जनतेला दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिर्शी येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या भेटीप्रसंगी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील कणकुंबी, जांबोटी, निलावडे, नेरसा, शिरोली, मोहिशेत, नागरगाळी, कापोली आदी ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील बऱयाच गावांना रस्त्यांची सोय नाही. रस्ते विकासकामाची योजना मंजूर झाली तरी वनखात्याच्या अडसरामुळे या ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील संपर्क रस्त्यांच्या विकासाची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. यामुळे त्या गावांना वाहने पोहचत नसल्याने बऱयाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः पावसाळय़ात आरोग्य सुविधा पोहचत नसल्याने अनेकांना समस्या निर्माण झाल्या की, आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने स्वर्गाची वाट धरावी लागते. शिवाय गरोदर महिलांचे त्रास विचारता कामा नये. शाळकरी मुलांना शाळेला जाण्यासाठी 5-10 कि. मी. जंगलातून पायपीट करावी लागते. या गावांना कच्चे रस्ते आहेत. नदी-नाल्यांवर पूल नाहीत, यामुळे दुर्गम भागातील सर्व गावांना रुग्णवाहिका जाऊ शकेल, इतक्या रुंदीचे पक्के रस्ते झाले पाहिजेत. त्या ठिकाणी यापूर्वी पक्के रस्ते मंजूर झाले. पण वनखात्याने अडथळा निर्माण केल्याने मंजूर झालेली विकासकामे रखडल्याने आपण जातिनीशी लक्ष घालून रस्ते विकासातील वनखात्याचा अडसर दूर करावा, अशी मागणी केली आहे.
गोव्याला जाणाऱया रस्त्याचा विकास करा
कर्नाटकातून गोव्याला जाण्यासाठी खानापूर तालुका हद्दीतून तीन रस्ते असून त्यापैकी एक महामार्ग तसेच दोन राज्यमार्ग आहेत. पण दोन्ही राज्यमार्गांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याने त्यावरून वाहने चालविणे कठीण होत आहे. शिवाय महामार्गापैकी खानापूर, लोंढा, रामनगर रस्त्याचे काम बंद पडल्याने गोव्याला जाणारे तालुक्यातील तिन्ही मार्ग धोकादायक बनले आहेत. यामुळे त्या तिन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित खात्याला आदेश द्यावा व कर्नाटक-गोवा मार्गावरील होणारी वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पंडित ओगले यांच्यासमवेत किरण तुडवेकर, नारायण चन्नापूर, मारुती सुंठकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार अनंतकुमार हेगडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून लगेच संबंधित अधिकाऱयांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून सूचना केल्या. संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रत्येक ग्राम पंचायतीला आरोग्य केंद्र मंजूर करा
केंद्र व राज्य शासनाने आरोग्यविषयक विविध योजना आखल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच आजारी व्यक्तीला वेळीच आरोग्य सुविधा प्राप्त व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रा. पं. मध्ये आरोग्य केंद्र सुरू करावे. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतील, याचा गांभीर्याने विचार करून दिल्लीमधील मोहल्ला क्लिनिक धर्तीवर प्रत्येक ग्राम पंचायतीला 1 आरोग्य केंद्र मंजूर करावे, अशीही मागणी निवेदनात केली आहे.