कोविडच्या भयाण परिस्थितीशी मुकाबला करणाऱया गोव्यासह महाराष्ट्राला देखील ‘तौक्ते’ या चक्रीवादळी तुफानाशी संघर्ष करावा लागला. आतापर्यंत आलेल्या अनेक वादळांच्या तुलनेत हे वादळ जास्त भयानक होते. भारतीय हवामान खात्याने या वादळाची गेल्या चार दिवसांपासून अचूक माहिती दिली. गेल्या काही वर्षात अरबी समुद्रात अनेक चक्रीवादळे आली परंतु जसजशी ती भारताच्या किनारपट्टीकडे येऊ लागत तसतशी त्याच्यातील तीव्रता कमी होत जात होती तर काही वादळांचे वाटेतच विसर्जन झाले तर काही वादळे सुदानच्या दिशेने सरकली. आजवर अनेक वादळे अरबी समुद्रात तयार झाली परंतु 1994 नंतर प्रथमच गोव्याला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला. या वादळाच्या वाऱयाचा वेग ताशी 170 कि.मी. पर्यंतच होता. हे वादळ थेट गोवा वा कोंकणला बसले नाही मात्र ते पुढे सरकताना जो काही तडाखा देऊन गेले त्यातून गोवा व कोकणची झालेली नुकसानी ही अपरिमित अशीच आहे. कोविड महामारीच्या फैलावामुळे अगोदरच जबरदस्त आर्थिक फटका गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रालादेखील बसलेला असताना आता या चक्रीवादळाने ‘दुष्काळात तेरावा महिना’ तयार केला आहे. गोव्यात वीज खात्याचे 500 पेक्षा जास्त खांब उखडून पडले. वीजतारा तुटून गेल्या. गोव्यातील अनेक भागात 24 तासांपेक्षा जास्त काळ वीजप्रवाह ठप्प झालेला होता. राजधानी पणजीची परिस्थिती रविवारी अत्यंत बेहाल झाली होती. असंख्य जुने वृक्ष, जे शहराची शान बनलेले ते जमीनदोस्त झाले. 500 पेक्षाही जास्त घरांची छपरे उडून गेली. मोठय़ा प्रमाणात गोव्यात लागते माड उन्मळून पडले. एका पणजी शहरातच 9 इंच एवढा विक्रमी पाऊस झाला. संपूर्ण गोवा रविवारी तौक्ते वादळाच्या मिठीत अडकलेला होता. गोव्याबरोबर तिथून सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड, वैभववाडी, रत्नागिरी जिल्हा इत्यादी कोकणातील गावांमध्येही तौक्ते वादळाने हाहाकार माजविला! तौक्ते वादळ गोव्यात वा कोकणात थेट पोहोचले नसले तरी या वादळाचा डोळा म्हणजेच वादळाच्या केंद्रबिंदूपासून 100 कि.मी. दूरवर होते, तरीदेखील गोव्याला वादळी वारे आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोकणातील परिस्थिती भयानक होती. कोकणात फार गरिबी आहे. कोविडमुळे प्रचंड नुकसानी सहन करणाऱया महाराष्ट्राला चक्रीवादळातील आपदग्रस्तांना मदत देण्याची तरी ताकद शिल्लक आहे का? कोकण म्हटल्यावर सर्वांना मासे, काजू आणि आंबे आठवतात. डिसेंबर 20 पासून मे 2021 पर्यंत दर महिन्याला एक दोन वेळा जोरदार पाऊस पडून गेल्याने यंदा आंबा व काजू उत्पादनावर विपरीत परिणाम झालाच होता. त्यातच कोविड महामारीमुळे उरला सुरला आंबादेखील महाराष्ट्रात वा देशातील विविध भागात पोहोचू नाही शकला. हे संकट कोसळले होते त्यातूनही मार्ग काढू पाहणाऱया व झाडांवर अद्याप हापूस लटकत होता. काही दिवसांनी तो बाजारपेठेला पाठविण्याच्या तयारीत असलेल्या बागायतदार, ठेकेदार पूर्णतः अडचणीत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ातील शेकडो घरे वादळाच्या वेगाने उडाली. अनेकजण बेघर झाले आहेत. त्यांची जबाबदारी आता कोण घेणार? कोविडच्या बाबतीत गोव्यात काय, अन् महाराष्ट्रात काय, सर्वत्रच जे राजकारण चालले आहे तशी परिस्थिती तौक्ते वादळानंतर निर्माण होऊ नये अशीच अपेक्षा व्यक्त करावी लागेल. अलीकडच्या काळात मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती होण्याचे कारण म्हणजे ‘ग्लोबल वॉर्मिंग’. जागतिक पातळीवर तापमान वाढत आहे. निसर्गाला ते सहन होत नाही. मान्य नाही. मग भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा विविध माध्यमातून निसर्ग आपला राग व्यक्त करीत आहे. त्याचे परिणाम हे मानवजातीलाच भोगावे लागत आहेत. तौक्ते वादळाने कोंकण, गोवा आणि उर्वरित किनारी महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिलेला आहे. आतापर्यंत अनेक वादळांपासून गोव्याची मुक्तता झाली होती मात्र 1994 नंतर प्रथमच गोव्याला हा वादळाचा भीषण फटका बसला आहे. कोंकण व गोव्यात या वादळाने रविवारी हाहाकार माजवला, तरी हे वादळ 100 ते 125 कि.मी. दूरवरून गेले. जर वादळ थेट आले असते तर गोव्याची अवस्था काय झाली असती! या वादळाने गोवा व कोंकण पट्टीतील हजारो माड आडवे झाले. जे काही जगले त्यांचा वरचा आकार बिघडला. म्हणजे या वादळाच्या वाऱयाची तीव्रता किती व कशी होती याची कल्पना येते. या वादळामुळे फार मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली नाही. याचे सारे श्रेय हवामान खात्याला जाते. तसेच महाराष्ट्र सरकारने कोंकणातील विविध किनारी भागातील नागरिकांचे केलेले स्थलांतर या दोन कारणांमुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झालेली नाही. या वादळाची तीव्रता जेवढी गोव्यात होती, तेवढी ती कोणत्याही भागात नव्हती. आता आज सकाळी हे वादळ गुजराथमध्ये पोहोचेल आणि त्याचा फटका त्या राज्याला बसणार. ही वादळे म्हणजे निसर्गाचा कोप आहे हे विसरून चालणार नाही. गोव्यात या वादळामुळे झाडे, घरे, इमारती, वीज खांब, भ्रमणध्वनी मनोरे, सार्वजनिक बस स्थानके अशा अनेक प्रकारे झालेले नुकसान हे प्रचंड आहेच. याशिवाय निसर्गाचा हा कोप भौगोलिक पातळीवरही झालेला असून अनेक किनाऱयांची झालेली धूप समुद्राने आजुबाजुच्या परिसरात केलेले अतिक्रमण यातून हा समुद्र भूप्रदेश मोठय़ा प्रमाणात गिळत चाललेला आहे, हे दिसून येतेच. निसर्गाशी आजवर मानवाला दोन हात करता आलेले नाहीत. निसर्गाला आव्हान देण्याच्या प्रयत्नही कोणी करू नये. तौक्ते चक्रीवादळाने आपली सत्त्वपरीक्षा घेतलेली आहे आणि निसर्गानेही आपल्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तौक्तेने मात्र दुष्काळात तेरावा महिना आठवला!
Next Article घाऊक महागाई दर 10.49 टक्क्यांवर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.