अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, उद्धवा साधुसंत घरी आले की, वैष्णवाला अत्यंत आनंद होतो. त्याची आदराने लगबग सुरु होते. काय करू आणि काय नको अशी त्याची अवस्था होते. तो श्रीहरीची मंदिरे श्रृंगारतो व गुढय़ा तोरणे उभारून मखरे बांधून मोठा उत्सव करतो. संतांना मोठय़ा आदराने बसवून घेऊन वैष्णव कीर्तनाचा आरंभ करतात. टाळ, वीणा, मृदंग वाजवीत, अनेक प्रकारची चरित्रे गायन करीत मोठा गजर करतात आणि वेळोवेळी आनंदाने गर्जना करून हरिनामाचा जयघोष करून सोडतात.
आता दीक्षेचे लक्षण ऐक. वैदिक आणि तांत्रिक अशा दोन प्रकारच्या दीक्षा आहेत. वैष्णवव्रताचे ग्रहण करणे ती वैष्णव दीक्षा होय. वैष्णव दीक्षा घेतलेल्यानी वैष्णव व्रताचा धर्म पाळण्यासाठी प्रतिवार्षिक येणारी पर्वे यथासांग चालवावी. मोठय़ा आनंदाने उचंबळून यात्रेला निघावे. दिंडय़ा, पताका व ध्वज बरोबर घेऊन नामघोषाचा गजर करून सोडावा. ज्या देवाच्या यात्रेला जावयाचे, तो देवच आपल्या घरात आणावा. ज्या मूर्तीवर आपली भक्ति बसली असेल, त्याच मूर्तीची स्थापना करावी. मूर्तीला पाहताच तन-मन तृप्त व्हावे, जिचे दर्शन होताच तहान-भूक हरपेल अशा प्रकारे त्या मूर्तीचे गोंडस प्रसन्नमुख असावे. अशी सर्वांगसुंदर मूर्ती घडवून घेतल्यानंतर थोर थोर साधूंना जमवून एकनिष्ठेने अग्न्युत्तारणादि विधि करावा आणि तिच्या डोळय़ांवरचे आच्छादन काढून एखाद्या थोर पुरुषाच्या हातून तिची प्राणप्रति÷ा करवावी. विस्तीर्ण देवालय बांधावे. त्याच्या सभोवार वन, उद्यान व उपवन करावे. मळे, बागा, तलाव, विहिरी बांधून सारे स्थळ विश्रांति घेण्याजोगे रमणीय करून सोडावे. अनेक प्रकारचे वृक्ष जिथे लावले जातात त्याला ‘वन’ असे म्हणतात, फळबागांना ‘उपवन’ असे म्हणतात आणि फक्त फुलझाडे लावली की ‘उद्यान’ असे म्हणतात. ही सर्व तयार करून पूजेसाठी कृष्णार्पण करावीत. चहूकडून व्यापारी लोक येऊन बाजार भरावा म्हणून देवापाशी नगर वसवावे. रात्रंदिवस वेदाध्ययन, शास्त्रश्रवण व कीर्तन होत असावे. इतके करावयास आर्थिक सामर्थ्य नसेल आणि करावे असा हेतु असून द्रव्य नसेल तर श्रीमान् लोकांचे साहाय्य घेऊन भक्तियुक्त अंतःकरणाने सर्व पार पाडावे किंवा भगवद्?भक्तांना एकत्र बोलावून, त्यात जे कोणी भक्तिमान् असून श्रीमंत असतील, त्यांनी भक्तिपूर्वक द्रव्यसाहाय्य केल्यास त्या द्रव्याने हे सर्व करावे. आपापल्या गावातील भव्य देवळे कशी तयार झाली असतील ते वरील वर्णन वाचल्यावर वाचकांच्या लगेच लक्षात येईल अशा भव्य कामांच्या मागे ईश्वरी इच्छा कार्य करत असते व करणाऱयाच्या पाठीवर ईश्वरी वरदहस्त असतो. पुढे भगवंत म्हणतात, नुसती देवळे निर्माण करून थांबू नये. तेथील रोजची पूजा अर्चा व्यवस्थित होतीये ना याकडेही लक्ष द्यावे. देवळात देवाची एकदा प्राणप्रतिष्ठा केली, की पुन्हा त्या देवळात जो कधीही येत नाही, तो आळशी व हतभागी होय हे लक्षात ठेव. तो खरा भक्त नव्हे. जो मूर्तीची प्रतिष्ठा करण्याचे कर्तव्य जाणतो, तो द्रव्य खर्चून मोठी भक्ति ठेवतो. अगदी हलके काम करणे सुद्धा देवाचेच काम आहे असे समजून तो देऊळ झाडायला हातात खराटा घेण्यालाही मागे सरत नाही. शिष्य व सेवकजन असले तरीसुद्धा प्रति÷ा व सन्मान वगैरे सर्व सोडून तो स्वतः दंभरहितपणाने देवालयामध्ये सडासंमार्जन करतो. मोठय़ा कौशल्याने रांगोळय़ा घालतो, त्यांत नानाप्रकारच्या आकृत्या काढून त्या आकृत्यांमध्ये अनेक प्रकारचे शोभिवंत रंग भरतो. त्याला माझ्या भजनामध्ये मोठी आवड असते.
ज्याप्रमाणे एखादा गरीब भिकारी असावा, त्याप्रमाणे वागून तो सेवा करतो. हलकी सेवा करण्यामध्ये त्याला मोठा आनंद होतो. माझ्या भजनामध्ये तो कधीही कृत्रिमपणा नाही. पुष्कळ संपत्ति खर्चुन मी येथे हे देवालय बांधून देवाची प्रति÷ा केली, मी मोठा भक्त आहे, असा अभिमान धरत नाही. मनांत भक्ती नाही आणि वरकरणीच खटाटोप करून भक्तीचा पसारा मांडावयाचा, अशी जी ढोंगाची कृती असते, तिला भाविक भक्त शिवतसुद्धा नाही. भक्ताने अभिमान धरू नये आणि कोणत्याही विषयाची अभिलाषा बाळगू नये.
क्रमशः