ऑनलाईन टीम / परभणी :
राज्यातील शेतकऱयांच्या हिताची कामे फक्त विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करू शकतात. फडणवीसांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हलचाली पक्षाकडून सुरू आहेत, मात्र, त्यांनी दिल्लीत जाऊ नये, अशी विनंती माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
परभणीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोणीकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसच शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात. त्यांनीच इस्राईलच्या धर्तीवर 20 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला मंजूरी दिली. त्याचा फायदा शेती आणि उद्योगधंद्यांना होणार आहे.
फडणवीसांना सध्या राज्यसभेत रिक्त होणाऱया जागेवर पाठविण्याच्या हलचाली पक्षाकडून सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरील या हलचालींमुळे भाजपातील इतर नेतेही नाराज आहेत. त्यांची केंद्रात वर्णी लागल्यास राज्यातील शेतकऱयांचे प्रश्न तेवढय़ा गंभीरतेने सुटणार नाहीत. त्यामुळे त्यांनी राज्यातच रहावे, अशी विनंती लोणीकर यांनी कार्यक्रमावेळी केली.