ऑनलाईन टीम / पुणे :
शहरातील पूर्व भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार्या भामा-आसखेड योजनेचे काम पूर्णत्वास आले असून, लवकरच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक योगेश मुळीक, अनिल टिंगरे, सुनिता गलांडे, संदीप जर्हाड, राहुल भंडारे, शितल शिंदे, ऐश्वर्या जाधव, मुक्ता जगताप, स्वीकृत नगरसेवक आशाताई जगताप, विशाल साळी, सामाजिक कार्यकर्ते महेश गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, मोहन शिंदे सरकार, अरविंद गोरे, आशुतोष जाधवयांच्या समवेत आज भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भामा-आसखेड प्रकल्पाला भेट देऊन पाहाणी केली.
मुळीक पुढे म्हणाले, ‘राजकीय अडथळे, पुनर्वसनाचा तिढा, न्यायालयातील दावे यामुळे या योजनेचे काम रेंगाळले. परंतु त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये नसलेली एकवाक्यता आणि त्यांनी उभा केलेला शहरी – ग्रामीण वाद कारणीभूत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकल्पग्रस्तांचे समाधान करता आले, तसेच करंजविहिरे, आळंदी, कुरूळी, वाकी-वाडा या प्रकल्पांमुळे बाधित गावांमध्ये पुणे महापालिकेला विकासकामे करता आली. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पाणी या कुरूळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून केळवाडीतील 80 मीटर जलवाहिनीचे काम पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणार्या चाचण्या घेण्यात येतील. त्यामुळे वडगावशेरीकरांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भामा-आसखेडचा प्रकल्प पूर्ण होत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 2.8 टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी मिळणार आहे. त्यामुळे कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर या भागाचा 2041 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, या भागातील नागरिकांची टँकरमाफियांच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. नागरिकांना नियमित, पुरेसा, शुद्ध पाणीपुरवठा होणार असून, या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.