प्रतिनिधी /वास्को
गोव्याला दहा वर्षे स्थिर सरकार देणाऱया भाजपाला पुन्हा निवडून आणण्याची गरज आहे. केवळ गोव्याच्या हितासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठीही भाजपाला गोवा जिंकणे महत्वाचे आहे. भाजपाचे सरकार गोवा स्नेही आणि विकास स्नेही असून केंद सरकारची गोव्याच्या विकासासाठी साथ लाभलेली आहे पुढेही गोव्याच्या साथीनेच देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांनी दाबोळीतील भाजापच्या कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह माजी आमदार सिध्दार्थ कुंकळय़ेकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, नगरसेवक दीपक नाईक, सुदेश भोसले, विनोद किनळेकर, अमेय चोपडेकर, सरपंच सॅबी परेरा, माजी नगरसेवक दाजी साळकर, दाबोळी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप सुद, गोवा आंद्रा संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गोव्यात स्थायीक झालेल्या मुळ आंध्र प्रदेशच्या नागरिकांचीही यावेळी उपस्थिती होती. आंध्र प्रदेशच्या तेलगु बांधवांसाठी केंद्रीय मंत्र्यांनी तेलगुतूनही मार्गदर्शन केले. स्थानिक तेलगु नागरिकांसाठी आंध्र प्रदेशप्रमाणेच गोवाही मातेसमान असून तेसुध्दा या भुमीवर प्रेम करीत आहेत असे सांगून भाजपालाही त्यांची साथ लाभत असल्याचे ते म्हणाले. भाजपा विकास स्नेही आहे. गोव्याशीही भाजपाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. गेली दहा वर्षे गोव्यात भाजपानेच स्थिर सरकार दिलेले आहे. त्यापूर्वी गोव्यात राजकीय स्थिती खराब होती. भाजपा सत्तेवर येताच गोव्यात विकासालाही चालना मिळाली. केंद्र सरकारला साथ देत गोव्याने विविध क्षेत्रात विकास साध्य केला. सक्षम सरकार आणि सक्षम नेतृत्व भाजपाच देऊ शकतो. अन्य कोणताही पक्ष सक्षम सरकार देऊ शकणार नाही. सध्या गोव्यात राजकीय पर्यटनही सुरू आहे. राजकीय पक्ष गोव्यात येतील आणि निवडणुकीनंतर निघूनही जातील. परंतु भाजपा इथेच राहणार आहे. विकास करणार आहे. गोव्याच्या हितासाठीच नव्हे तर देशाच्या विकासासाठीही भाजपाला गोवा पुन्हा जिंकायला हवा असे केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले.
केंद्रीयमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना कोरोना काळातील कठीण परीस्थिती कथन करून पंतप्रधानांनी या परिस्थितीवर कशी मात केली. परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उत्पादने कशी घडवली. या काळात स्वंयपूर्ण भारत कसा घडवला. जगात कसा आदर्श निर्माण केला. इतर देशानाही कशी मदत केली, या विषयावर विवेचन केले. या संकट काळात पंतप्रधानपदी मोदी नसते तर परिस्थिती काय असती असा प्रश्नही त्यांनी केला. मागच्या सात वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा बदललेली असून मोदीनी या देशाला मजबूत नेतृत्व दिलेले आहे असे रेड्डी म्हणाले. पंतप्रधानांनी मागच्या सात वर्षांत केलेला विकास, सोडवलेले देशातील प्रश्न, विविध क्षेत्रात दाखवलेले कतृत्व याचा उल्लेख करून आज जगभरातून भारताकडे अपेक्षने पाहिले जात आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात मंत्री माविन गुदिन्हे तसेच दाजी साळकर यांचेही भाषण झाले. यावेळी केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांचा तेलगु बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला. दाबोळीतील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपा प्रवेश केला.