चोवीस तासात 509 जणांचा मृत्यू : 35 हजार 181 जणांची कोरोनावर मात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात 47 हजार 092 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यापूर्वी एक दिवस म्हणजे मंगळवारी 41 हजार 965 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठवडाभरात तब्बल सातवेळा दिवसभरात 40 हजारहून अधिक नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तसेच सक्रिय रुग्णांमध्ये सुमारे 70 हजारहून अधिकने वाढ झाली आहे.
भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद केरळ राज्यात करण्यात येत आहे. केरळात कोरोना संसर्गामुळे बुधवारी 32 हजार 803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात एकूण 40 लाख 90 हजार 036 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 20 हजार 961 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील चोवीस तासात म्हणजे बुधवारी दिवसभरात 509 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 35 हजार 181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 39 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक असून सध्या 3 लाख 89 हजार 583 रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत.