डॉ. कल्लडका भट यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
इंग्रजांनी आपल्या देशाची लूट केली. आपल्यावर अन्याय केला. या अन्यायाविरुद्ध पेटून क्रांतिकारकांनी बंड केले. आपल्या जीवाचे बलिदान देत त्यांनी देश इंग्रजांच्या तावडीतून सोडविला. आपल्या देशाला भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासारख्या क्रांतिकारकांची वैभवशाली परंपरा आहे, असे प्रतिपादन पुत्तार येथील विवेकानंद विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष डॉ. कल्लडका भट यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव शाखेच्यावतीने मंगळवारी गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृह आयोजित रंग दे बसंती या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक अनिष मेत्रांनी, चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रामचंद्र गौडा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दक्षिण-मध्य विभागाचे सहसमन्वयक स्वामी मर्लापूर, शहर अध्यक्ष डॉ. एस. व्ही. गोरबल, शहर सेपेटरी किरण दुकानदार, राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर आनंद होसूर उपस्थित होते.
भरतनाटय़मने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आनंद होसूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना स्वामी मर्लापूर म्हणाले, केवळ जयंती दिवशी फुले वाहून चालणार नाही तर क्रांतिकारकांचे विचार समाजात रुजण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.