माजी आमदार बसवराजू यांचे प्रतिपादन : खानापूर येथे पत्रकार परिषद : राज्यातही जनतेचा आम आदमी पक्षाकडे वाढता कल
प्रतिनिधी /खानापूर
आपल्या देशामध्ये सत्तेवर असलेला भाजप असो किंवा विरोधी पक्षातील काँग्रेस, निजद व राष्ट्रीय पक्ष असोत, हे जनहितापेक्षा स्वहिताचेच काम अधिक करतात. यामुळे देशामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. या भ्रष्टाचारात देशातील सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाकडे असल्याचे मत आपचे कर्नाटकातील प्रमुख नेते माजी आमदार एच. डी. बसवराजू यांनी खानापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले, देशातील राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सतत तीनवेळा आम आदमी पक्षाला सत्ता मिळाली. या पक्षाने दिल्लीमध्ये प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज, मोफत शुद्ध पाणी, चांगले शिक्षण व गरिबाला परवडेल अशी आरोग्य सुविधा केवळ जनतेकडून मिळालेल्या करातूनच उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता देशातील इतर राज्यातही जनतेचा कल आम आदमी पक्षाकडे वाढू लागला आहे. खानापूर तालुक्यातील जनतेनेही आता आम आदमी पक्षामध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी बोलताना राज्य संघटक विजयकुमार शर्मा म्हणाले, आम आदमी पक्ष केवळ राजकारण करण्यासाठी जन्माला आला नसून भ्रष्टाचारमुक्त व जनताभिमुख प्रशासन देण्यासाठी जन्माला आला आहे. आम आदमी पक्षाच्या कार्याचा अनुभव आता दिल्लीकरांना प्रत्यक्षात मिळाला आहे. आम आदमी पक्षाच्या धोरणामुळे दिल्लीमधील प्रत्येक कुटुंबाला सरकारकडून या ना त्या योजनेतून महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. दिल्लीमधील आम आदमी सरकारने शिक्षणात घडवून आणलेली क्रांती संपूर्ण जगामध्येच कौतुकास पात्र ठरली आहे. यामुळे आता पुढील काळात कर्नाटक राज्यातही आम आदमी पक्ष मजबूत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामध्ये सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष विजयकुमार पाटील म्हणाले, आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. यावेळी सर्वसामान्य व सुशिक्षित युवकांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच संपूर्ण जिल्हय़ात गावपातळीवर आम आदमी पक्ष स्थापन केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी खानापूर तालुका प्रमुख भैरु पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून तालुक्यात आम आदमी पक्षाने संघटना स्थापन करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेनंतर आम आदमी सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये माजी आमदार बसवराजू, विजयकुमार शर्मा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी गुंजीकर, मोहन मुळीक, प्रभाकर पाटील, रमेश कौंदलकर, चंद्रकांत मेदर, मंजुनाथ बागेवाडी, मुकुंद कुऱहाडे, लबिब शेख, कल्पना सावंत, ए. आय. किल्लेदार, इब्राहिम अत्तार, रुक्मिणी ठोंबरे, अनुराधा सुतार, लक्ष्मी ठोंबरे, सरस्वती सुतार उपस्थित होते.