सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय अन् व्यावसायिक प्रशिक्षणाचे कैद्यांना मिळताहेत धडे : हिंडलगा कारागृहात उपक्रम
रमेश हिरेमठ /बेळगाव
एखाद्या गुन्हय़ात अटक होऊन कारावास भोगणाऱयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळाच असतो. नेहमी ‘गुन्हेगार’ या नजरेनेच त्यांच्याकडे समाज पाहात असतो. आता समाजाचा हा समज खोटा ठरविण्यासाठी कारागृहात अनेक विधायक उपक्रम सुरू आहेत. कैद्यांमध्ये परिवर्तन घडवून भला माणूस घडविण्याचे प्रयत्न निरंतर सुरूच आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून कैद्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे.
ब्रिटिशकाळातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला एक वेगळाच इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या कारागृहात स्वातंत्र्यसैनिकांना स्थानबद्धतेत ठेवण्यात येत होते. संपूर्ण राज्यात फाशीची शिक्षा देण्याची सोय या एकाच कारागृहात आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळय़ा न्यायालयांनी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या एका महिलेसह 27 कैद्यांना याच कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. या कैद्यांना ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षित बराकी (अंधार कोठडय़ा) या कारागृहात आहेत.
हिंडलगा कारागृह नेहमीच येथे येणाऱया गुन्हेगारांमुळे ठळक चर्चेत असते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार बन्नंजे राजा असो, एकाकी महिलांना गाठून त्यांचा गळा घोटणाऱया दंडुपाळय़ टोळीतील गुन्हेगार असो, फाशीच्या प्रतीक्षेत असणारा कामांध उमेश रेड्डी असो, सायनाईड मल्लिका असो आदी अनेक कैद्यांमुळे अधूनमधून हे कारागृह चर्चेत असते. आता एका वेगळय़ा विषयासाठी ते ठळक चर्चेत आले आहे. कैद्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कारागृह प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे हे कारागृह आता चर्चेत आहे.
1162 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात गुरुवारी दुपारपर्यंत 971 कैदी होते. यामध्ये 77 महिलांचा समावेश आहे. क्षणभराच्या रागाच्या भरात गुन्हे करून कारागृहात येणाऱया कैद्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षणाचा आधार घेण्यात आला आहे. या कारागृहात 181 कैदी पूर्णपणे निरक्षर आहेत. त्यांना शिक्षण देण्याचे काम कारागृह प्रशासनाने हाती घेतले आहे.
प्रत्येक बराकीत राहणाऱया निरक्षर कैद्यांना शिकविण्याची जबाबदारी साक्षर कैद्यांवर सोपविण्यात आली आहे. एका साक्षर कैद्याला दहा निरक्षरांना शिकविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रौढ शिक्षण विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. शशिकांत यादगुडे हे शिक्षक कैद्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. प्रौढ शिक्षण विभागाच्या ए. एम. जयश्री व तालुका संयोजक एच. एस. बजंत्री यांच्या सहयोगाने हे काम सुरू आहे. कैद्यांना शिकविण्यासाठी लागणारे साहित्य प्रौढ शिक्षण विभागातून पुरविण्यात येत आहे.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून परिवर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. कैद्यांमध्ये मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी योग, ध्यानावर भर देण्यात येत आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मदत घेण्यात येत आहे. वेगवेगळय़ा संस्था व संघटनांच्या मदतीने व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे. दुग्ध व्यवसाय, बकरी व शेळीपालन, कुक्कुटपालन, पेंटींगचे प्रशिक्षण देऊन कैद्यांना स्वावलंबी बनविण्यात येत आहे.
प्रशिक्षण घेणाऱया कैद्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अडचणी येऊ नयेत, थेट उद्योग थाटता यावा, या उद्देशाने व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. सध्या कारागृहात टेलरिंग, सुतारकाम, विणकर व्यवसाय, बेकरी व्यवसाय चालतो. याबरोबरच आता डेअरी व्यवसाय, सेंद्रिय शेती, कुक्कुटपालन आदीसंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे.
पुढील महिन्यापासून मोटारवाईंडिंग व कुकर-मिक्सर आदी गृहोपयोगी वस्तूंची दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे कारागृहातील अधिकाऱयांनी सांगितले. या कारागृहातील 89 कैद्यांनी दुग्ध व्यवसाय व 60 कैद्यांनी बकरी व शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना सहजपणे कर्ज मिळेल, यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्हा कौशल्य विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रौढ शिक्षण विभागांतर्गत कैद्यांना शिक्षित करण्यात येत असले तरी त्यांची परीक्षा घेण्याचे वांदे आहेत. म्हणून बेळगावला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (उत्तरप्रदेश) यांच्याकडून स्टडी सेंटर मंजूर करावे, यासाठी कारागृह प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. हे केंद्र मंजूर झाल्यास शिक्षण घेणाऱया कैद्यांची परीक्षा घेण्याचे काम सुलभपणे होणार आहे.
‘कारागृहे’ ही ‘सुधारगृहे’ व्हावीत, असे महात्मा गांधीजी यांनी सांगितले होते. याचप्रमाणे कारागृहात आता कैद्यांच्या सुधारणेवर भर देण्यात येत असून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पोटापाण्यासाठी त्यांचे हाल होऊ नयेत, समाजात त्यांच्या वाटेला पुन्हा अवहेलना येऊ नये, यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे कारागृहाचे अधिकारी म्हणतात. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी कैद्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रागाच्या भरात गुन्हे करून आम्ही कारागृहात आलो. येथून बाहेर पडताना गुन्हेगार म्हणून बाहेर पडणार नाही. एक उत्तम कारागीर म्हणून बाहेर पडू, असा विश्वास बाळगून कैदी प्रशिक्षण घेत आहेत.
शेती करण्यातही कैदी अव्वल
वेगवेगळय़ा प्रकरणात शिक्षा झालेले कैदी शेती करतात. प्रयोग म्हणून सेंद्रिय शेती केली जात आहे. यंदा दोन एकरमध्ये उत्तम भात पिकविण्यात आले आहे. तर एक एकर जमिनीत 22 टन ऊस पिकविण्यात आला असून तो कारखान्यालाही पाठविण्यात आला आहे. कारागृहाचे साहाय्यक उपअधीक्षक शहाबुद्दीन के. व गार्डन विभागाचे यल्लाप्पा नाईक यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभते आहे.
कैदीही शेवटी समाजात वावरणारा माणूस…- कृष्णकुमार
कैद्यांमध्ये सुधारणा केली पाहिजे. कारण एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात अटक होऊन कारागृहात येणारा कैदीही शेवटी याच समाजात वावरणारा माणूस असतो. त्याच्यातील माणूसपण टिकविण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्याला दूर ठेवण्यासाठी सात्विकतेकडे न्यावे लागते. सध्या तेच काम या कारागृहात सुरू आहे, अशी माहिती मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी दिली. कैद्यांच्या मनशांतीसाठी कारागृहात भव्य ध्यान मंदिर आहे. तथागत गौतम बुद्धांसमोर ध्यान केले तर त्यांचा मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. याबरोबरच त्यांना शिक्षित करण्यासाठी वेगवेगळय़ा संस्था, संघटना व सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याबरोबरच पर्यावरण रक्षणाचेही धडे दिले जात आहेत. कारागृहाच्या आवारात एक हजार रोपटय़ांची लागवड करून निगराणीची जबाबदारी कैदी आनंदाने पार पाडत आहेत, याचा अभिमानही कृष्णकुमार यांना आहे.