राहूल देशपांडे यांचे उद्गार, तरुण भारतशी साधला दिलखुलास संवाद
प्रज्ञा मणेरीकर /पणजी
’मी वसंतराव’ चित्रपटात भूमिका करायची संधी मिळणे ही स्वप्नवत होती. भूमिका साकारण्यापूर्वी एक आदरयुक्त दडपण होते. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच मी खूप प्रामाणिकपणे भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्गार सुप्रसिद्ध शास्रीय गायक राहुल देशपांडे यांनी तरूण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना काढले.
माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास ’मी वसंतराव’या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल, असे ठामपणे सांगणाऱया पंडीत वसंतराव आणि त्यांच्या संगीताचा वैभवशाली वारसा लाभलेले त्यांचे नातू राहुल देशपांडे यांच्या गायकीची एक परंपरा आपल्यासमोर मांडणार आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, संगीताची ही सुरेल मैफल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल पासून चित्रपटगृहात रंगणार आहे. त्यानिमित्त दै.तरुण भारतच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.
मी वसंतराव चित्रपट करण्यामागचा उद्देश म्हणजे आजोबांची जी गोष्ट होती किंवा जो जीवनप्रवास होता तो एवढा उत्क?ठापूर्ण होता. यामुळे हा प्रवास समोर येणे आवश्यक आणि महत्वाचे होते. म्हणून ’मी वसंतराव चित्रपट बनविण्यात आला असल्याचे राहुल देशपांडे यांनी सांगितले.
चित्रपट करताना काही अडचणी आल्या नाहीत. त्यांचे आयुष्य मला चांगल्या पद्धतीने माहिती होते. याशिवाय त्यांच्याविषयी खूप संशोधनही करण्यात आले होते. कौटुंबिक नात्याच्या बाहेर येऊन एक व्यक्तिरेखा म्हणून ते माझ्यासमोर आले तेव्हा मला जे भावले ते जगायला मिळाले. आजोबांनी ज्या गोष्टी अनुभवल्या होत्या. त्या मला जगायला मिळाल्या. असे अभिमानाने राहूल यांनी सांगितले.
वसंतरावांच्या व्यक्तिरेखेला शोभेल आणि साजेल अशा पद्धतीचे काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून मी 15 वर्षांपूर्वी वसंतोत्सव सुरु केला. वसंतराव कुठल्याही संगीत प्रकाराला कमी लेखत नव्हते. प्रत्येक प्रकारावर त्यांची हातोटी होती. संगीत फक्त संगीताचा भाग म्हणून न राहता संगीत साजरा करण्यासाठी वसंतोत्सव सुरु केला. अशी माहिती राहुल देशपांडे यांनी यावेळी दिली.
आजची पिढी ही शास्रीय संगीताकडे वळत आहेत. कार्यक्रमांना का?लेज , शाळेतील मुले येतात हे पाहून नक्कीच आश्वासक ?वाटते की आजची पिढी शास्रीय संगीत नक्कीच पुढे नेईल.असे राहूल सांगतात.
चित्रपटात एकूण 22गाणी आहेत. ज्यापैकी आजोबांनी गायिलेली पण आहेत. पण या चित्रपटाच्या अनुषंगाने जे प्रसंग येत जातात त्यावर अशी नऊ गाणी कम्पोझ करण्यात आली आहेत. आणि ती गाणी कथानकाचे एक भाग म्हणून येतात. असे राहूल देशपांडे यांनी सांगितले.
वयाच्या 20व्या वर्षापासून मी गोव्यात येतो. गोव्यात मी सगळी नाटके केली. संगीत नाटक , अनेक कार्यक्रम गोव्यात केले. गोवेकरांचे प्रेमच मला परत घेऊन येते. असे राहूल देशपांडे यांनी सांगितले.