प्रतिनिधी / वैराग
बार्शी – तालुक्यातील धामणगाव येथील संत माणकोजी बोधले महाराज यात्रा महोत्सव 2020 रद्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीला सुरुवात होऊन पौर्णिमेपर्यंत गावात दरवर्षी यात्रामहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात पार पडतो. गेल्या 350 वर्षांपासून या यात्रेची अखंड परंपरा सुरू असून यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाउनमुळे यंदाच्या यात्रा उत्सावाला ब्रेक लागला आहे.
पंढरीच्या पांडुरंगाने धामणगावच्या संत माणकोजी महाराजांना दर्शन दिले अन् दर आषाढी एकादशीला आपण धामनगावला येऊ, असे सांगितले, अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून धामणगावात दरवर्षी आषाढी एकादशीला 5 दिवसांची यात्रा भरते. या यात्रेला तालुक्यातून आणि जिल्ह्यातून हजारो भाविक गावात दाखल होतात. विशेष म्हणजे गावातील मंडळी जी बाहेरगावी असते, तीही यात्रेसाठी आपल्या गावची वाट धरतात. मात्र, यंदा ही मंडळी गावाकडेच आलेली आहे, पण कोरोनाच्या महामारीमुळे यात्रामहोत्सव रद्द करण्यात आला आहे.
यात्रेनिमित्त गावात, कुस्तीचे फड रंगतात, भजन किर्तन महोत्सव पार पडतो, मनोरंजानाचे अनेक कार्यक्रम होतात, गावकरी अन् वारकी मोठ्या आनंदात एकत्र येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असून भाविकांना संत माणकोजी महाराजांचे दर्शनही घेता येणार नाही. गेल्या 350 वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा यंदा प्रथमच खंडीत होत असल्याचे ह.भ.प. विवेकांनंद बोधले महाराज यांनी सांगितलं. दरम्यान, गावात पार पडलेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, तलाठी प्रशांत शेकदार, ग्रामसेवक एस.एस.गुजरे, उपसरपंच तानाजी पाटील, हभप विवेकानंद बोधले, पोलीस पाटील गणेश मिसाळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. तसेच, यात्रा महोत्सव रद्द झाल्याने कुणीही धामणगावात दर्शनासाठी येऊ नये, असे पोलिस प्रशासन कडून सांगण्यात आले आहे.