अतिक्रमणे हटवून घेण्याची मनपाने केली सूचना : अरूंद रस्त्यामुळे व्यावसायिकांची अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध रेल्वे फाटकांवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. मात्र सर्व्हिस रोडची समस्या जैसे थे आहे. कपिलेश्वर उड्डाणपूल आणि धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाशेजारील देखील सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यामुळे धारवाड रोड येथील सर्व्हिस रोडचा मुद्दा निकालात काढण्यासाठी येथील अतिक्रमणे काढून घेण्याची सूचना महापलिकेच्या अधिकाऱयांनी केली आहे.
उड्डाणपुलामुळे रेल्वेफाटकावरील समस्या निकालात निघाली. मात्र स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांची समस्या जैसे थे आहे. सर्व्हिस रोड नसल्याने व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे. धारवाड रोड येथील उड्डाणपूल 45 फुटाचा करण्यात आला. पण अतिक्रमणामुळे सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. येथील काही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेऊन मालमत्ता हटविण्यास स्थगिती घेतली आहे. तर एका बाजूला नाला असल्याने नाल्यावर रस्ता कसा करायचा? हा मुद्दा निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर सर्व्हिस रस्ता करण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जागा सोडण्याची तयारी दर्शवून सर्व्हिस रस्त्याचा मुद्दा निकालात काढण्याची मागणी केली होती. पण काही मालमत्ताधारकांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान होत असल्याने सर्व्हिस रस्त्यास विरोध केला होता. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे.
मात्र येथील रस्ता करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनपाच्या अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी परिसराची पाहणी करून अतिक्रमणे हटवून घेण्याची सूचना नागरिकांना केली आहे. सर्व्हिस रस्ता 20 फुटाचा करण्याचा प्रस्ताव असून त्यानुसार अतिक्रमणे हटवून घ्यावीत, अशा सूचना केल्या होत्या. पण काही नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने याबाबतची माहिती अभियंत्यांची भेट घेऊन दिली. सध्या हा सर्व्हिस रस्ता करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत. पण न्यायालयीन वादामुळे महापालिकेला कितपत यश मिळणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे मनपाच्या भूमिकेकडे मालमत्ताधारकांचे लक्ष लागले आहे.