खबरदारीच्या उपाययोजना अनिवार्य : काही राज्यांमध्ये मात्र निर्बंध कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच धार्मिकस्थळे सोमवारपासून खुली झाली आहेत. देशातील प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी फार मोठी गर्दी दिसून आलेली नाही. सर्व मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह निर्जंतुकीकरणाची विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे आश्वासक चित्र दिसून आले आहे. आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरातही दर्शन सुरू झाले असून दिवसभरात कमाल 6 हजार जणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर भारतातील सर्व प्रमुख तीर्थस्थळांमध्ये लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. या तीर्थस्थळांमध्ये अयोध्या, काशी, मथुरा इत्यादींचा समावेश आहे.
तर मॉल्सच्या बाहेर थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्यात आली होती. व्यापारी आणि कर्मचाऱयांनाही प्रवेशापूर्वी थर्मल स्क्रीनिंगला सामोरे जावे लागले आहे. मॉल्सच्या प्रवेशद्वारावर एक रजिस्टर तयार करण्यात आले असून सर्वांचे संपर्क क्रमांक त्यात नमूद करण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या भीतीदरम्यान धार्मिकस्थळे, हॉटेल्स आणि मॉल्स सुरू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे देशातील अर्थचक्र पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढत असले तरीही अर्थव्यवस्थेवरील संकट दूर करण्यास प्राधान्य देत आरोग्य उपाययोजना राबविण्याचे धोरण प्रशासनाने आता हाती घेतले आहे.
सॅनिटायजेशनवर भर
अनेक धार्मिक स्थळांच्या बाहेर सॅनिटायजर टनेल बसविण्यात आल्याचे आढळून आले आहे. मंदिरांमध्ये प्रसाद वाटपावर मात्र बंदी कायम आहे. तर मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थनेसाठी विशेष उपाययोजना लागू करण्यास सांगण्यात आले आहे. चर्चमध्ये प्रार्थनेनंतर बाहेर पडल्यावर परस्परांना कमी अंतर ठेवून भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. गुरुद्वारामध्ये लंगर पार्सल स्वरुपात दिला जाणार आहे.
काही जणांना मज्जाव
शहरांमध्ये मॉल्स सुरू झाले असले तरीही नव्या नियमावलीनुसार 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गरोदर महिला आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. याचबरोबर आरोग्यसंबंधी समस्या असणाऱयांना मॉल्समध्ये न येण्याचा निर्देश देण्यात आला आहे. मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करविण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मॉल बंदच
महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि राज्यात धार्मिक स्थळ खुले करण्यासंबंधी निर्णय अद्याप घेतलेला नाही. या कारणामुळे देशभरात धार्मिक स्थळे सुरू झाली असली तरीही राज्यातील भाविकांना दर्शन घेता येणार नाही. धार्मिकस्थळांमध्ये लोकांच्या एकत्र येण्याच्या अनुमतीसंबंधी अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे राज्याच्या कायदा तसेच न्याय विभागाच्या सचिवांनी सांगितले आहे. याचबरोबर राज्यात मॉल, चित्रपटगृहे, क्लब, मोठी कमर्शियल स्पेसही पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
काशी विश्वेश्वराचे दर्शन आजपासून
काशीमधील विश्वेश्वराचे दर्शन मंगळवारपासून भाविकांना घेता येणार आहे. मंगळवारी सकाळी मंगल आरती पार पडल्यावर भाविकांना प्रवेश दिला जाणर आहे. एकावेळी मंदिरात केवळ 5 जणांना प्रवेश मिळणार आहे. सर्वप्रथम थर्मल स्क्रीनिंग होईल, शरीराचे तापमान योग्य वाटल्यास प्रवेश दिला जाईल. गर्भगृहात भाविकाला जाता येणार नाही. तसेच मंदिरातील रेलिंग, घंटेला स्पर्श करता येणार नाही. मंदिरात जाऊ पाहणाऱया भाविकांना स्वयंचलित सॅनिटायजेशन यंत्राला पार करावे लागणार आहे. सर्वांना मुखपट्टा परिधान करणे सक्तीचे असणार आहे.
मथुऱयात भाविकांनी घेतले दर्शन
ब्रजमध्ये बहुतांश मंदिरे भाविकांसाठी खुली झालेली नाहीत. परंतु श्रीकृष्ण जन्मस्थानी दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळाली आहे. कोरोनामुळे शहराबाहेरील भाविक दिसून आलेले नाहीत. परंतु काही स्थानिक भक्तांनी स्वतःच्या आराध्य दैवताचे दर्शन घेतले आहे.
अयोध्येत दिसले भाविक
सुमारे दोन महिन्यांनी रामनगरी अयोध्येत भाविक राम जन्मभूमी आणि हनुमानगढी येथे दर्शनासाठी पोहोचले. शरयू काठावर पवित्र स्नानाची पर्वणीही भाविकांनी साधली आहे. परंतु तेथे 5 पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगसह मंदिरांमध्ये जाण्याची अनुमती देण्यात आली होती. धार्मिक वातावरण हळूहळू पूर्वपदावर येण्याची अपेक्षा असल्याचे संतांनी म्हटले आहे.
5 राज्यांकडून धार्मिकस्थळे बंदच
केंद्र सरकारच्या अनुमतीनंतरही कोरोना संकटामुळे 5 राज्यांनी सोमवारपासून पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱया प्रार्थनास्थळांना खुले केलेले नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱया 820 धार्मिक स्थळांना सोमवारपासून खुले करण्याची अनुमती दिली होती. परंतु सिथती पाहता यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला होता. ओडिशातील जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, अनंत वासुदेव मंदिर, प्राचीन शैव केंद्रे आणि हीरापूर येथील 64 योगिनी पीठासह अन्य स्थळांना 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.