पाकमधील पवित्र गुरुद्वारावर मुस्लिमांकडून दगडफेक : भारताकडून पाकिस्तानचा निषेध
वृत्तसंस्था/ अमृतसर, लाहोर
शीखांचे पहिले धर्मगुरु नानकदेव यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील लाहोरनजिकच्या ननकानासाहिब येथील गुरुद्वारावर काही मुस्लीम गटाने केलेल्या दगडफेकीचा भारताने तसेच शीख समुदायाने निषेध केला आहे. या परिसरात अद्यापही तणाव असून शीखांना या ठिकाणी नगरकीर्तन करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शीख समाजाची सर्वोच्च शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य पाकिस्तानला जाणार आहेत.
भारताने या घटनेचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत शीख समुदायाच्या रक्षणासाठी पाकिस्तान सरकारने पावले उचलावीत, असे म्हटले आहे. लुधियानामधील शाही इमामा मौलाना हबीब उर रहमान यांनीही याचा निषेध केला असून कर्तारपूर साहिब कॉरिडॉरमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारत असताना काही समाजकंटक त्यात खीळ घालत आहेत. पाकिस्तानने गुरुद्वारावर हल्ला करणाऱयांना तत्काळ अटक करुन शासन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
एसजीपीसी सदस्य पाकिस्तानला जाणार
दरम्यान, या घटनेचा आढावा घेण्यासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) चार सदस्य पाकिस्तानमध्ये घटनास्थळी जाणार आहेत. हे सदसय संपूर्ण घटनेबाबत आढावा घेतील तसेच पाकिस्तानातील या प्रांताचे गव्हर्नरांचीही भेट घेतील, असे समितीचे अध्यक्ष गोविंदसिंह लोंगोवाल यांनी म्हटले आहे. राजेंदरसिंग मेहता, रुपसिंग, सुरजितसिंग आणि राजिंदरसिंग यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या घटनेचा एसजीपीसी तीव्र निषेध करत असून पाकिस्तानने या परिसराला सुरक्षा पुरवावी आणि शीख समुदायातील नागरिकांचे रक्षण करावे, असे आवाहनही लोंगोवाल यांनी केले आहे.
दिल्लीत निदर्शने
या घटनेचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच निषेधाचे फलकही झळकवले. या निदर्शनामध्ये भाजपचेही सदस्य सहभागी झाले होते. याची चौकशी करण्याचे निवेदन पाकिस्तानी उच्चायुक्तांना देण्यात आले आहे. भाजपने या घटनेचा दाखला देत काँग्रेस आणि विरोधकांना आतातरी नागरिकत्व कायद्याचे महत्त्व कळले आहे काय? असा सवाल केला आहे.
हल्ल्याची पार्श्वभूमी
नानकानासाहिब येथील गुरुद्वाराचे गंथी यांची मुलगी जगजितकौर हिचे जबरदस्तीने अपहरण करुन धर्मांतरण करण्यात आले व तिचा विवाह स्थानिक मुस्लीम युवक मोहम्मद हसन यांच्याशी लावण्यात आला. त्याला शीख समुदायाने विरोध करत निषेध केल्याने मुस्लिमांच्या गटाने दगडफेक केली. या जमावाचे नेतृत्व हसनच करत असल्याचे येथील शीख समुदायाचे म्हणणे आहे.
मुस्लीम जमावाने दगडफेक केल्याने तेथील शीख समुदाय दहशतीखाली आहे. दंगेखोरांनी या शहराचे नाव बदलून गुलाम-ए-मुस्तफा करण्याचीही धमकी दिली आहे. मुस्लिमांची ही निदर्शने सुमारे चार तास सुरु होती.
दरम्यान, भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरु असताना पाकिस्तानात ही घटना घडल्याने त्याकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. भारताने या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शीख भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. या हल्ल्याने पाकिस्तानातील शीख समुदाय प्रचंड तणावात तसेच दहशतीखाली आहे.