कोकण नमन कलामंचातर्फे मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊन काळात रत्नागिरीतील नमन मंडळांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यावर बंधने आल्याने आर्थिक संकट कोसळले. पण अशा काळात रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मंडळांची व्यथा जाणून 122 मंडळाना केलेले आर्थिक सहकार्य दिलासा देणारे आहे. अशा या मंडळांच्या कलावंतांना राजाश्रय व पेन्शन मिळवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची मागणी कोकण नमन कलामंचाच्यावतीने नुकतीच करण्यात आली.
2019-20 या वर्षातील जागतिक कोरोना महामारीमुळे मोठे संकट कोसळले. अशा लॉकडाऊन काळात जिल्हय़ातील सर्वच लोककलांवर संकट ओढवले. नमन मंडळांना कुठेही आपल्या कलेचे सादरीकरण करण्यालाही मुभा नव्हती. त्यामुळे नमन कार्यक्रमांच्या ठरलेल्या ऑडर्सही रद्द करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम नमन मंडळांना मोठय़ा आर्थिक समस्येला समोर जावे लागले. ज्या लोककलेच्या जोरावर गावोगावच्या मंडळांना आर्थिक हातभार लाभत असतो. पण ही सारी मंडळे लॉकडाऊन काळात पुरती कोलमडून पडली, पण उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नमन मंडळांसाठी या पडत्या काळात आशेचा किरण दाखवला. आर्थिक समस्या जाणली आणि त्यांना आर्थिक सहकार्याचा हातभार लावण्यासाठी पाऊल उचलले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील 122 नमन मंडळांना त्यांनी तत्काळ दिलेला आर्थिक हातभार मोलाचा ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण होत पडत्या काळात या पारंपरिक कलेला दिलेली उभारी नमन मंडळांसाठी नवसंजीवनी ठरल्याचे कोकण नमन कलामंचाचे अध्यक्ष प्रभाकर कळंबटे यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत याचा सदैव असलेला सहकार्याचा हातभार व मार्गदर्शन या सर्व लोककलावंतासाठी लाभदायी ठरत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. आज नमन मंडळांच्या एकत्रिकरणाची चळवळ विधानसभा मतदार संघात गतीमान झाली. सुरूवातीला 122 नमन मंडळांची नोंद झालेली मंडळे आज 129 इतकी पोहोचली आहेत. त्यामुळे मंडळांच्या समस्यांचे निराकारणासाठी शासन दरबारी योग्य प्रकारे आवाज पोहचवण्याचे काम कोकण नमन कलामंचातर्फे केले जात आहे. ही पारंपरिक जपणूक केली जात असलेल्या या लोककलेला राजाश्रय मिळावा व आयुष्यभर या कलेसाठी वाहून घेतलेल्या कलावंतांसाठी पेन्शन मिळावी. यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भात कोकण नमन कलामंचातर्फे पाली येथे निवासस्थानी भेट घेऊन मंत्री सामंत यांना निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी उद्योजक अण्णा सामंत यांचीही प्रमुख उपस्थिती तसेच मंचाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सहसचिव सुरेश होरंबे, संस्थापक श्रीधर खापरे, सदस्य विलास भातडे, सुरेश दसम उपस्थित होते.