कुपवाड / प्रतिनिधी :
केंद्र सरकारच्या प्रयत्नाने देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन स्वरुपात कृषी सुधारणा विधेयक कायदा लागू होत आहे. या कायद्याविषयी विरोधी पक्षांनी विविध माध्यमातून अनेक गैरसमज पसरवायला सुरवात केली आहे. हे पुर्णत: चुकीचे असून हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असे वक्तव्य सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी बामनोली येथे बोलताना केले.
नवीन कृषी सुधारणा विधेयक हा कायदा शेतकऱ्यांना समजावा. तसेच त्या बाबतचा गैरसमज दूर व्हावा, या हेतूने आपले कर्तव्य समजून सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कायदा समजावून सांगण्याचे काम बामणोली या गावात केले. यावेळी संपूर्ण कृषी कायदा सांगणाऱ्या पुस्तिकांचे वाटप शेतकऱ्यांना सुधीरदादा यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक भाजपचे सांगली ग्रामीण मंडळ अध्यक्ष संतोष सरगर यांनी केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तर अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य चिटणीस अश्रफ वांकर यांनी या कायद्याविषयी विरोधक चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावेळी शेतकरी संघटनेचे रावसाहेब ऐतवडे यांनी आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, शेतकरी सबलीकरण, संरक्षण हमीभाव, कृषिसेवा करार विधेयक, कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा)विधेयक, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.