ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नव्या भारताच्या पायाभरणीसाठी देशात नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. तंत्रज्ञानानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशवासियांना अधिक सक्षम करणे हाच या मागचा हेतू असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाचे वर्तमान आणि भविष्य बनवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला मोदींनी संबोधित केले. मोदी म्हणाले, देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सोपी आहे. या धोरणामुळे नव्या भारताची पायाभरणी होणार आहे. भविष्याचा विचार करूनच नवे धोरण अंमलात आणले जाईल. तंत्रज्ञानानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडत त्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांना 5 वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण दिल्याने त्यांचा पाया मजबूत होईल. समाजातील तेढ, भेदभाव यामुळे दूर होईल. शिक्षण आणि संशोधनातील दरी कमी होईल. योग्य शिक्षण, श्रम करण्याचे बळ देणारे नवे धोरण आहे. चालू कोर्स सोडून दुसरा कोर्स करण्याची नव्या धोरणात मुभा असेल. नवीन धोरणात कोणताही भेदभाव नाही. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. देशातील विचारवंत देशातच काम करतील, असे धोरण आहे. त्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.