बाजारपेठेत खरेदीसाठी दिवसभर नागरिकांची गर्दी : मार्गसूचीनुसार बाजारपेठेवर बंधने
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात नाईट-विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढलेली पाहायला मिळत आहे. रात्री 9 नंतर नाईट कर्फ्यू सुरू होणार आहे. त्यामुळे दिवसभर खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नाईट-विकेंड कर्फ्यूचा नियम जारी केला आहे.
बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी दिवसभर बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. नाईट कर्फ्युमुळे नागरिकांना रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदी करता येणार नाही. शिवाय व्यापाऱयांनाही मालाची विक्री करता येणार नाही. त्यामुळे 9 च्या आधीच बाजारात खरेदी-विक्री करावी लागणार आहे.
काही दिवसांपासून बाजारपेठ खरेदी विक्रीसाठी रात्री उशिरापर्यंत खुली होती. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार बाजारपेठेवर काही बंधने आणण्यात आली आहेत. डेअरी, फळे-भाजीपाल्यांची दुकाने, मांस विक्रीची दुकाने, मेडिकल व धान्य विक्री सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. मात्र, ग्राहकांना सामाजिक अंतर व तोंडाला मास्क लावूनच खरेदी करावी लागणार आहे.