प्रतिनिधी / नागठाणे :
गेल्या काही दिवसांपासून सातारा तालुक्यातील नागठाणे गावच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून, मंगळवारी रात्री नागठाणे ते पाली जाणाऱ्या जुन्या रस्त्यालगतच घरालगत असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून तीन शेळ्यांवर हल्ला करून ठार केले. येथे बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा निष्पन्न होऊनही वनविभागाने याकडे सोयीस्कररित्या नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केले. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागठाणे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागठाणे येथील जुन्या पाली रस्त्यावर ज्योतिर्लिंग वसाहतीमध्ये गोरख शिवराम साळुंखे यांच्या घरालगत असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या तीन शेळ्यांवर मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याने हल्ला केला.यामध्ये १ शेळी व २ बोकडे यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नागठाणे गावात भरवस्तीत बिबट्याचा वाबर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही बिबट्या कैद झाला होता.त्यानंतरही अनेकांना त्याचे दर्शनही झाले होते.वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेराही लावला. मात्र या कॅमेऱ्यात काय कैद झाले? हे तपासायची फक्त एकदाच तसदी वनविभागच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यानंतर तिकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे वनविभागाच्या एकंदर कारभाराबाबत येथील ग्रामस्थांमधूम तीव्र संताप व्यक्त होत असून या बिबट्याचा लवकरात लवकर वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणीही केली जात आहे.