काँग्रेसला जनतेचा पाठिंबा नाही : मुख्यमंत्री
प्रतिनिधी/ पणजी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) समर्थन करण्यासाठी व गोमंतकीय जनतेचा पाठिंबा दाखविण्यासाठी राजधानी पणजीत भाजपने काल शुक्रवारी समर्थन रॅली काढून नंतन जाहीर सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन घडवले आणि सीएए विरोधकांच्या यापुर्वी तेथेच झालेल्या सभेला तेथेच प्रत्युत्तर दिले. सीएए हा कायदा या देशातील नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी नसून या देशात इतर देशातून आलेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले. त्यांच्या आवाहनावरुन यावेळी तेथे जमलेल्या जनतेने सीएएला पाठिंबा व्यक्त केला.
31 डिसेंबर 2014 पूर्वी या देशात पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेशातून आलेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. त्याचा वेगळा अर्थ काढून काँग्रेस नेते व इतर विरोधक जनतेला विनाकारण भडकावत असून त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन नड्डा यांनी केले.
राहुल, सोनिया गांधींना नड्डांचे खुले आव्हान
सीएए कायद्याबाबत गोव्याची जनता जागृत आहे आणि त्या जागृतीचा परिणाम म्हणूनच समर्थन मोर्चा व सभा झाल्याचे सांगून नड्डा म्हणाले की, सीएए प्रकरणी राहुल गांधी तसेच इतर काँग्रेस नेत्यांना काहीच माहीत नाही. ते या विषयावर पाच ते दहा मिनिटे बोलू शकणार नाहीत, असा दावा नड्डा यांनी करून तसे खुले आव्हानही दिले.
काँग्रेसकडून स्वार्थी, देशविरोधी राजकारण
काँग्रेसने फक्त सीएए विषयावरून स्वार्थी तसेच देशविरोधी घाणेरडे राजकारण चालवले असून त्यास जनतेने बळी पडू नये, असे नड्डा म्हणाले. मोदी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. जम्मू काश्मिरमधील 370 कलम रद्द केले व आता सीएए कायदा आणला. गेली 70 वर्षे राज्य करणाऱया काँग्रेसला हे निर्णय करण्याची हिंमत झाली नाही. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरची जनता सुखावली असून आनंदात असल्याचा दावा नड्डा यांनी केला. गोवा राज्यासाठी मोदी सरकारने भरभरून दिले असून त्यातून साधनसुविधा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला जनतेचा पाठिंबा नाही : मुख्यमंत्री
सीएए या कायद्यामुळे गोव्यातील जनतेने घाबरु नये. त्यांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. गोव्याची जनता या कायद्यास पाठिंबा देत असल्याचे पणजीतील या विराट रॅली – सभेने सिद्ध झाले असून काँग्रेसने आयोजित केलेल्या सीएए विरोधी सभेला जनतेने पाठिंबा दिला नव्हता, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.
गोमंतकीय जनता मोदींच्या पाठिमागे खंभीरपणे उभाr
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून काँग्रेसला गेल्या 70 वर्षात जे जमले नाही ते मोदींनी केले. गोव्याची जनता पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारच्या मागे समर्थपणे उभी आहे. तसेच सीएएच्या विरोधात गोमंतकीय जनता नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. जनतेने या सीएए समर्थनासाठी आखलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला म्हणून डॉ. सावंत यांनी जनतेला धन्यवाद देऊन आभार मानले.
कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही : श्रीपाद नाईक
सीएएच्या विषयावरुन काँग्रेस पक्ष स्वार्थी राजकारण करीत असून जनतेला विनाकारण भडकावत आहे. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे. कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे. त्यामुळे कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय आयुष-संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सभेत बोलताना दिली.
काँग्रेसला जमले नाही ते भाजपने केले : माविन गुदिन्हो
गेली अनेक वर्षे जे काँग्रेसला जमले नाही ते भाजपने व पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी करुन दाखवले आहे. परंतु त्याचा वेगळा अर्थ लावून काँग्रेस पक्ष सीएए प्रकरणी जनतेत गैरसमज पसरवत आहे. त्यास जनतेने बळी पडू नये, गोव्यातील कुणाच्याच नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. गोमंतकीयांनी यापुढेही मोदींच्या पाठीमागे असेच उभे रहावे, असे आवाहन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
भाजपच्या गोवा प्रदेश अध्यक्ष या नात्याने हे आपले शेवटचे भाषण असून आता लवकरच नवीन अध्यक्ष नेमला जाणार आहे. गेली सात वर्षे सहकार्य केले म्हणून आपण सर्वांचे आभार मानतो, असे तेंडुलकर म्हणाले.
पर्यटन भवन, पाटो येथून भाजपतर्फे सीएएच्या समर्थनार्थ रॅली सुरु झाली. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेकांच्या हातात भाजपचे तसेच राष्ट्रध्वज फडकत होते. शिवाय अनेकांनी सीएएला समर्थन देणारे फलक हाती घेतले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, दोन्ही उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर व बाबू कवळेकर तसेच इतर मंत्रीगण, आमदार रॅलीत सहभागी झाले होते. पाटो पूल, चर्च चौक, राजधानी हॉटेल मार्गे हा मोर्चा आझाद मैदानावर आला आणि तेथे त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. रॅलीतून सीएए समर्थनाची घोषणाबाजी होत होती.
अल्पसंख्य शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी सीएए : आर्लेकर
राजेंद्र आर्लेकर यांनी सभेसाठी सर्वांचे स्वागत केले. हा कायदा व त्यातील तरतूद देशातील लोकांना लागू होत नाही. इतर तीन देशातून जे अल्पसंख्याक लोक भारतात आले व राहतात त्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा असल्याचे सांगून जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मोर्चाच्या मार्गावर तसेच सभेच्या ठिकाणी व आझाद मैदानासभोवती मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आझाद मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येऊन वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. आझाद मैदान पोलिसांनी वेढण्यात आले होते. सभेचे सूत्रसंचालन दामोदर नाईक यांनी केले. सभेच्या सुरुवातीस पणजीचे महापौर उदय मडकईकर व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी पुष्पगुच्छ देऊन नड्डा यांचे स्वागत केले.