प्रतिनिधी / वास्को :
नागरिकत्व दुरूस्ती कायदा अल्पसंख्यांक समाजाविरूद्ध नाही. देशाच्या हितासाठी हा कायदा अंमलात आणलेला आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासाठी भारतीय जनता पक्षाला व्यापक पाठींबा मिळत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षानी या कायदय़ाला विरोध चालवलेला आहे असे वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
मंगळवारी नवेवाडे येथील दाबोळी भाजपा कार्यायालयात आज शुक्रवारी पणजी येथील आझाद मैदानावर होणाऱया जाहीर सभेच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या रॅली व सभेला दाबोळी मतदारसंघातील दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. सीएए व एनआरसीवरून विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले..
जनतेला सीएए आणि एनआरसीची जाणीव आहे. सीएए आणि एनआरसी मुस्लीम समुदायांच्या विरोधात नाहीत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भारतीय कॉम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश खरात हे यापूर्वी सीएएच्या बाजुने बोलत होते आणि याची नोंदही आहे. परंतु तेच आता सीएए आणि भाजपा सरकार विरोधात बोलत आहेत. लोकांनी विरोधकांच्या बुलथापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, दाबोळी भाजपा गटाध्यक्ष संदीप सूद, दाबोळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष अनिता थोरात यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजपाचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशिदास नाईक, चिकोळणा बोगमाळो पंचायतीचे उपसरपंच अरूण नाईक, पंच लक्ष्मण कवळेकर, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते दिगंबर आमोणकर, लिगोर मोतेंरो उपस्थित होते.
सूत्रसंचालन अनिता थोरात यांनी केले तर सुदेश भोसले यांनी आभार मानले.