भाजप सरचिटणीस दामोदर नाईक यांचे आवाहन, मडगावात निषेध फेरी
प्रतिनिधी / मडगाव
आमचा देश आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने जात आहे. त्यामुळे चीन घाबरलेला आहे. आता भारताच्या प्रत्येक नागरिकाने चीनच्या वस्तू वापरणे बंद करावे. तसेच त्यांचे टिकटॉक व इतर ऍप प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरून काढून टाकावेत, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस व फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक यांनी केले.
सोमवारी लडाख येथील गल्वान खोरे या भागात भारतीय व चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात भारताच्या सुमारे वीस जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. या घटनेचा भारतीय जनता पक्षा निषेध करतो. चीनने आमच्या 20 जवानांना ठार केले, तर त्यांच्या 200 जवानांना ठार करण्याची क्षमता भारताकडे आहे, असे नाईक म्हणाले.
नागरिकांनी चिनी वस्तू वापरू नयेत असे आवाहन करण्याकरिता मडगाव येथे आयोजित केलेल्या निषेध फेरीत ते बोलत होते. यावेळी फातोर्डा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, मनोहर बोरकर, रघुवीर शिरोडकर व भाजपचे इतर कार्यकर्ते या निषेध फेरीत सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने भारतात तयार होणाऱया वस्तूंची खरेदी करावी. तसेच चीनने आता भारताकडे वाईट नजरेने पाहू नये. चीनने नेहमी पाठीमागून हल्ला केलेला आहे. चीनकडे समोरून हल्ला करण्याची क्षमता नसल्याचे यातून स्पष्ट होते. आमच्या जवानांमुळेच आमचा देश सुरक्षित आहे. जोपर्यंत आम्ही चिनी वस्तू वापरणे बंद करणार नाही तोपर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना खरी श्रद्धांजली मिळणार नाही. प्रत्येकाने यावर विचार करण्याची गरज आहे. गल्वान खोऱयातील घटनेसारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी योग्य निर्णय घेतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे नाईक म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे’, ‘हिंदी-चिनी बाय बाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.