मालवण पंचायत समितीचा एकमुखी ठराव : पं. स.ची पहिली ऑनलाईन सभा
प्रतिनिधी / मालवण:
रत्नागिरी जिल्हय़ात होऊ घातलेला नाणार प्रकल्प विकासाभिमुख असल्याने तो प्रकल्प शासनाने प्राधान्याने सुरू करावा, अशी एकमुखी मागणी मंगळवारी मालवण पंचायत समितीच्या पहिल्या ऑनलाईन मासिक सभेत करण्यात आली. याबाबतचा ठराव सदस्य सुनील घाडीगावकर यांनी मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव शासन माहितीसाठी पाठविण्याची सूचना करण्यात आली.
सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते. सभेत पंचायत समितीतून उपसभापती राजू परुळेकर, अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर सहभागी झाले. सुनील घाडीगावकर, सागरिका लाड, विनोद आळवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी सहभागी झाले. देवबागचा सुपुत्र दर्शन बांदेकर याची मुंबई इंडियन्स संघाच्या 35 खेळाडूंमध्ये निवड झाल्याबद्दल मधुरा चोपडेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विद्यार्थी पळविण्यावरून नाराजी
तालुक्यातील ग्रामीण भागातील खासगी संस्थांच्या हायस्कूलमधून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी आपल्या शाळेत वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याची भीती आहे. अशाप्रकारे विद्यार्थी पळविण्याचा प्रयत्न करणाऱया मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुनील घाडीगावकर यांनी केली. हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्या पद्धतीने पटसंख्या वाचविण्यासाठी धडपडत आहेत, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या शाळांतील मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना अजिंक्य पाताडे यांनी केली. राजेंद्र पराडकर यांनी याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना दिले.
वाढीव बिले त्रासदायक
वीज कंपनीने रिडींग न घेतल्याने ग्राहकांना हजारो रुपयांची थकबाकीसह वीज बिले आली आहेत. याला सर्वस्वी शासनाची यंत्रणा कारणीभूत आहे. मात्र, शासनकर्तेच वीज बिले भरण्यासाठी सूचना करत आहेत. त्यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे. शासनाने वाढीव वीजबिले तात्काळ मागे घेऊन जनतेच्या वेदना जाणाव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला वीज वितरणला सामोरे जावे लागेल, अशी भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. यावर वीज कंपनीच्या अधिकाऱयांनी वीजमाफी अगर इतर सूचना केलेल्या नसल्याने बिल भरणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.
स्थानिक बसफेऱया सुरू कराव्यात
एसटी महामंडळाने स्थानिक बसफेऱया बंद करून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक फेऱया बंद केल्याने अनेक ग्रामस्थ गावात अडकून पडले आहेत. यामुळे स्थानिक मार्केटला अवकळा आली आहे. एसटी महामंडळाने भारमानात वाढ होण्याच्यादृष्टीने स्थानिक फेऱया सुरू करून जनतेची गैरसोय दूर करावी, अशी मागणी माजी उपसभापती अशोक बागवे यांनी लावून धरली. एसटी फेऱया सुरू करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात यावी, अशी मागणी राजू परुळेकर यांनी केली.
बिनकामाचे मोबाईल टॉवर
तालुक्यात श्रेयवादासाठी अनेक गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात आले. हे टॉवर सध्या बंद असून ग्राहकांचे हाल होत आहेत. दूरसंचार विभागात माहिती देण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे बंद असलेले मोबाईल टॉवर सुरू करण्यासाठी वीज कंपनीने प्रयत्न करावेत, अशी सूचना सदस्यांनी केली.