प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर येथील नाथ पै चौक येथील नामफलक धूळखात पडला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नामफलक बसविणे आवश्यक होते. परंतु हे नामफलक सध्या इतरत्र धूळखात पडले असल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत
आहे.
नाथ पै चौक येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना नामफलक काढण्यात आले होते. काँक्रिटीकरण झाल्यानंतर पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण झाले तरी अद्याप नामफलक बसविण्यात आला नाही. या नामफलकावर मराठीसही कन्नड व इंग्रजीमध्ये नाथ पै चौक असे लिहिले असल्यामुळे नवीन नागरिकांना हे फलक उपयुक्त ठरत आहेत. परंतु फलक धूळखात पडले असल्याने सरकारी पैशांचा अपव्यय होत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. हे नामफलक पुन्हा होते त्या जागी लावावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.