राज्यस्तरीय ग्रामीण साहित्यसंमेलनात पुरस्कार प्रदान
ओटवणे/ प्रतिनिधी-
मालेगाव येथील आई प्रतिष्ठानचा पहिला राज्यस्तरीय कवी कुसुमाग्रज पुरस्कार सावंतवाडी येथील मालवणी कवी प्रा. डाॕ. नामदेव गवळी यांच्या भातालय या काव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह गौरवपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मालेगाव येथे शनिवारी झालेल्या आई प्रतिष्ठानच्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्यसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक डाॕ. संजय कळमकर यांच्याहस्ते प्रा. नामदेव गवळी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रल्हाद दिलघे, संजय फतनानी, गिरीश सुर्यवंशी आदी साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डाॕ. नामदेव गवळी हे कारीवडे गावचे सुपुत्र असुन भाव अंतरीचे हळवे लंगार फेम मयूर गवळी यांचे ते काका आहेत. ते वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. प्रा. डाॕ नामदेव गवळी यांचा बहुचर्चित भातालय हा काव्यसंग्रह २०१८ ला लोकवाड्मयगृलने प्रकाशीत केला. या काव्यसंग्रहात कोकणातील कष्टकरी शेतक-याचा आत्मस्वर त्यांच्या स्व अस्तित्वासह बोलीत शब्दांकीत झाला आहे.
या काव्यसंग्रहाला यापूर्वी पद्म्श्री नामदेव ढसाळ, यशवंतराव चव्हाण डाॕ वसंत सावंत असे आतापर्यंत एकूण १२ राज्यपुरस्कार प्राप्त झाले आहेत. या काव्यसंग्रहातील त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ स्वायत्त विवेकानंद काॕलेज येथे बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच या काव्यसंग्रहावर डाॕ. रणधीर शिंदे, प्रोफेसर डाॕ. गोविंद काजरेकर लेखक प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर, कवी मोहन कुंभार, प्रा. वैभव साटम आदी प्रसिद्ध साहित्यिकानी लिखाण केले आहे.