उर्वरित 19 जणांची करण्यात आली सुटका
प्रतिनिधी/ मडगाव
नायजेरियन किनारपट्टीजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या 20 खलाश्यांपैकी गोव्याचा तरूण ब्रिटो डिसिल्वा याचा मृत्यू झाल्याची माहिती असून इतरांची सुटका करण्यात आल्याची माहिती नायजेरियन किनारपट्टीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने काल दिली आहे.
15 डिसेंबर रोजी आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रात ‘एमव्ही डय़ूक’ या जहाजावरुन सर्व 20 भारतीय खलाशांचे अपहरण करण्यात आले होते. ‘अबूजा’ येथील भारतीय उच्चायुक्तांनी रविवारी ट्विटद्वारे समुद्री चाच्यांच्या बंदिवासात असलेल्या एकाचा प्रतिकूल परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
गोव्याचे अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी रविवारी सांगितले की, समुद्री चाच्यांच्या बंदिवासात असलेल्या गोव्यातील तरूणाची मृत्यू झालेला आहे.
नायजेरियन चाच्यांकडून अपहरण करण्यात आलेला युवक आंबेली येथील असून चार गोमंतकीय खलाशामध्ये ब्रिटो डिसिल्वा याचा अपहरणानंतर मृत्यू झालेला आहे. काल रविवारी समुद्री चाच्यांनी 18 खलाशांची सुटका केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नरेंद्र सावईकर यांनी यांनी ट्विटद्वारे केली आहे.
आम आदमी पार्टी (आप) गोव्याचे संयोजक एल्विस गोम्स म्हणाले की, ओलीस ठेवलेल्या सर्व समुद्री खलाशांना मुक्त केले गेले पाहिजे. ‘एकाला मृत्यू आल्याने इतरांच्या सुटकेचा आनंद आत्ता ओसरला आहे’.
एल्विस गोम्स यांचे मित्र आणि सहकारी ग्रामस्थ रॉबी रेगो हे समुद्री चाच्यांनी सोडलेल्यांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. ते पुढे म्हणाले की, गोव्यातील सहकारी दलातील आंबेली येथील एका युवकाच्या मृत्यूच्या बातमीमुळे ओलिस नाटक संपल्याबद्दलचा आनंद कमी झाला.
‘आप’ या प्रकरणी कारवाईसाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर यांचे लक्ष वेधत होते. आमच्या खलाशी विभागाचे प्रमुख कॅप्टन वेंझी व्हियेगस हे ब्रिटनमधील शिपिंग कंपनीकडून नियमित माहिती मिळवित होते अशी माहिती त्यांनी दिली.