ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक समाधान अण्णा चव्हाण ( 37), भरताबाई चव्हाण ( 32), मुलगा गणेश ( 6), मुलगी आरोही ( 4) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घरात राहत होते. ते झोपले असताना त्यांचा झोपेतच गळा चिरण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रात्रीची असून आज सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच मालेगांवसह नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत. समाधान हा रिक्षाचालक आहे. तर त्याची पत्नी मोलमजुरी करुन आपला कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. ही हत्या चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
या घटनेमुळे परिसरात सन्नाटा पसरला आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.