खानापूर / प्रतिनिधी
संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष वेधलेल्या एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या बुधवार दि. 14 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निजद अल्पसंख्याक सेलचे राज्याध्यक्ष नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील रयत अभिवृद्धी पॅनेलचे सर्व पंधराही उमेदवार विजयी झाले. आणि मलप्रभा साखर कारखान्याच्या इतिहासात नव्या क्रांतीला सुरुवात झाली.
मलप्रभा साखर कारखाना गेल्या काहीवर्षात विविध कारणामुळे आर्थिक डबघाईला आला आहे. यामुळे कारखान्याने 2019-20 सालच्या गळीत हंगामातील जानेवारीपासून गळीत हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाची बिलेच दिली नाहीत. शिवाय 2017-18 सालातील ऊस बिलही थकित झाले आहे. तसेच कारखान्याच्या कामगारांचा गेली सात महिने पगारही झाला नाही. या सर्व कारणामुळे कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बडय़ाबडय़ा राजकारणी लोकानी कारखान्याच्या निवडणुकीकडे पूर्णत: पाठ फिरविली होती. कारखान्याची एकूण परिस्थिती पाहता निवडणूक होईल की नाही, अशी शंका होती. त्यावेळी मलप्रभा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांनी नासीर बागवान यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी शेतकऱयांनी दिलेल्या पाठिंब्यावर आपले पॅनेल उभे केले. त्या पॅनेलला माजी केंद्रीय मंत्री व कारखान्याचे विद्यमान संचालक बाबागौडा पाटील यांचे चिरंजीव प्रकाशगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आव्हान उभे केले होते. तर सात उमेदवारानी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यामुळे निवडणुकीला बरीच रंगत आली होती. बुधवारी सकाळापासूनच मतदान करण्यासाठी सभासद शेतकऱयांची गर्दी झाली होती. तसे पाहिल्यास साखर कारखान्याचे जवळपास 15 हजार शेतकरी सभासद आहेत. पण सहकार खात्याच्या नवीन कायदय़ानुसार त्यापैकी केवळ 2400 सभासद मतदानास पात्र होते. त्यापैकी 2049 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 7 नंतर मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. अखेर रात्री 12.30 वाजता निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये बागवान पॅनेलचे सर्व पंधराही उमेदवार चारशे ते सहाशे मताच्या अंतरानी विजयी झाले. स्वत: नासीर बागवान यांनी ब गटातून एकतर्फी विजय मिळविला. तर शेतकरी सभासद गटातून त्यांच्या पॅनेलचे सर्व चौदाही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत सत्तारुढ पॅनेल विरुद्ध रयत पॅनेल अशीच लढत होत होती. पण यावर्षी सत्तारुढ पॅनेलनेच निवडणुकीकडे पाठ फिरविली. यामुळे निवडणुकीतील सर्व उमेदवार तसे नवखेच होते. निवडून आलेले बागवान पॅनेलमधील सर्व पंधराही जण प्रथम साखर कारखान्याच्या संचालकपदी निवडून आले आहेत.
त्यामध्ये अशोक शंकर यमकनमर्डी (गंदिगवाड), लक्ष्मण बन्नाप्प्पा यम्मी (मल्लापूर के. व्ही.), शंकरगौडा गौडाप्पा पाटील (बैलूर), मंजुनाथ दोड्डगौड पाटील (दास्तीकोप्प), जोतिबा रामाप्पा हैबती ( काद्रोळी), बसवराज शंकर भेंडिगीरी (एम. के. हुबळी), सिद्धाप्पा सिद्रामप्पा दुरपन्नावर, (हुलीकट्टी), अशोक कल्लाप्पा भेंडिगीरी (चिक्कमुन्नवळी), बसवराज यल्लाप्पा पुंडी (इटगी), भरतेश पारीस सेबन्नावर (देवरशिगेहळळी), संजीव मुन्नाप्पा हुबलेपण्णावर ( पारिश्वाड), सावंत बसाप्पा किरबसन्नवर ( तिगडोळी) लक्ष्मी उळव्याप्पा अरवळीकट्टी (हिरेबागेवाडी), मिनाक्षी सुर्यकांत नेलगळी (बोगूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. यानंतर बागवान समर्थकानी फटाकडे उडवून तसेच गुलालाची आतषबाजी करुन आपला आनंद व्यक्त केला.
कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करु (चौकट करणे)
मलप्रभा साखर कारखान्याची निवडणूक मी एक आव्हान म्हणून लढविली. त्यामध्ये शेतकरी सभासदानी आमच्या पॅनेलवर संपूर्ण विश्वास ठेवून आम्हाला विजयी केले. आणि आपली सेवा करण्याची संधी प्राप्त करुन दिली. ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात ऊस उत्पादकांच्या थकित बिलाबरोबरच या पुढील गळीत हंगामात आलेल्या उसाचे बिल वेळेत पूर्तता करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल, तसेच मलप्रभा कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही नासीर बागवान यांनी निवडणूक निकालानंतर बोलताना दिली. याकामी शेतकरी सभासदानी कारखान्याच्या कामगार वर्गानी सर्व प्रकारचे सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.