चौपटीने बिले आल्याने नागरिक संतप्त : अभियंत्यावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
नास्नोळा ग्रामपंचायत पातळीवर वीज खात्याची बिले चारपटीने भरमसाठ आलेली आहेत त्यामुळे नास्नोळाचे नागरिक संतप्त झाले आहेत. या नागरिकांनी नास्नोळा वीज खात्याच्या कार्यालयात धाव घेऊन अभियंता वर्गास जाब विचारला. ही बिले वाढण्यामागे तेथील बिलींग खात्यातील अभियंता कारापूरकर जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षतेमुळे गावातील नागरिकांना भरमसाठ चारपटीने बिले आलेली आहे. वीज मंत्री निलेश काब्राल यांनी हे लक्षात घेऊन या सहाय्यक अभियंता कारापूरकर यांच्यावर कारवाई करावी नंतरच आम्ही वीज बिले परतफेड करणार आहोत असा इशारा नास्नोळा गावातील नागरिकांनी दिला. वीज बिलांचा नासानोळा वासियांना ऐन लॉकडाऊनमध्ये शॉक लागला आहे.
या गावात ऐन लॉकडाऊनच्या काळात चारपटीने बिले आलेली आहे. याबाबत अभियंता वर्गास जाऊन जाब विचारल्यास ते प्रथम बिले भरा नंतर रिबेट देऊ असे सांगतात. अभियंता वर्गास जाब विचारल्यास ते अधिकारी नागरिकांविरोधात धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत देतात मग नागरिकांनी काय करावे असा प्रश्न येथील पंचसदस्य सतीश गोवेकर यांनी केला. सरकारने यावर कारवाई करावी असे ते म्हणाले.
नास्नोळातील ऍंथोनी नाझारेथ म्हणाले की, आपल्यास 11 हजार रुपये बिल आले आहे. यात चूक झालेली आहे. आम्ही बर्रेटो यांची भेट घेतली असता ती येत्या 3 दिवसात दुरुस्ती करून देणार असल्याचे ते म्हणाले. वयोवृद्ध रामनाथ वायंगणकर म्हणाले की, आपल्यास 1500 बिल येत होते ते आता साडेतीन हजार आले. चारपटीने वाढीव बिले आम्ही कशी भरणार. सुर्यकांत घाडी म्हणाले, आपल्यास 200 हून कमी बिल येत होते ते आता 589 आले. आता लॉकडाऊनची काळजी आहे आमही पैसे कुठून आणू असे ते म्हणाले. चैताली लक्ष्मण हुम्रस्कर म्हणाल्या की, घरात जेवण खाण्या, पैसे नाही आपल्या 500 बिल येत होते ते आता 2700 आले आहे. आपण पालेभाडी घेऊन वाडय़ावर फिरते त्यात आपली रोजी रोटी चालते. इतके पैसे आपण कुठून आणू. प्रसाद घाडी म्हणाले, वाढीव बिले आम्ही भरू शकत नाही. आता 3 हजाराहून अधिक बिल आले. ही बिले त्वरित कमी करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
दरम्यान वीज खात्याचे काही कर्मचारी गावात फिरून वीज बिलामध्ये चूक झाल्याचे सांगताना आढळून आले असून वीज बिले बदलून घ्यावीत अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे.