ऑनलाईन टीम / पुणे :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर मनसेचे पुण्यातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. मनसेचे स्थानिक नेते वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना, ‘लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू,’ असा इशाराच दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांची ही टीका मनसेला चांगली झोंबली आहे. गायकवाड म्हणाले होते की, राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका केली होती.
- तुला राज ठाकरे काय कळणार?
यावर वसंत मोरे यांनी गायकवाड यांना चांगलाच दम भरत, तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्कलि करू, असा इशारा देतानाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वतः गल्लोगल्ली फिरताना पाहिले आहे. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असे स्वतःचे नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
- राज ठाकरे म्हणाले होते …
राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्र बदलले आहे. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असे राज ठाकरे म्हणाले होते.