दिल्लीतून आलेला एकजण जिल्हा रुग्णालयात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिल्लीजवळच्या निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात रत्नागिरी शहरातील दोघांसह जिल्हय़ातील 8 ते 10 व्यक्तींचा सहभाग असल्याचे पुढे आले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील काही लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, रत्नागिरी शहरातील दोघांचा शोध घेण्यात आला असून त्यातील एकाला जिल्हा रुग्णालयात यंत्रणेने दाखल केल्याचे समजते. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे सुमारे 2 हजार लोक एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यात परदेशातूनही आलेल्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी आतापर्यंत 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 300 पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. अनेक लोक त्या कार्यक्रमानंतर इतर राज्यात गेल्याची माहिती शासनस्तरावरून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. महाराष्ट्रातूनही त्या कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांचा शोध सुरू झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान जिल्हय़ातूनही 8 ते 10 जण दिल्लीला गेल्याचे पुढे येत आहे. त्या पार्श्वभुमीवर पोलीस व प्रशासनाकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी शहरातील दोघे जण 7 मार्चला दिल्लीत निजामुद्दीन येथे पोहोचले. 7 ते 10 मार्चपर्यंत हे दोघे मरकज येथे थांबले. 12 मार्चला ते दोघे दिल्लीतून अहमदनगर येथे आले. अहमदनगर येथून 13 मार्चला हे दोघे रत्नागिरीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी तातडीने याबाबत घेतलेल्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी शहर परिसरातून एकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची चर्चा आहे. ही व्यक्ती मरकजला गेली होती की नाही, हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र खबरदारी म्हणून जिल्हय़ातील त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार स्तरावर संबंधित लोकांचा शोध घेण्याचे निर्देश प्रशासनस्तरावरून देण्यात आले आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची बेफिकीरी जिह्यासाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे.
होम क्वारंटाईनची संख्या 927
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या 927 वर पोहचली आहे. तर जिल्हा शासकीय रूग्णालयात 14 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन अतंर्गत निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पोस्ट पेमेंट बँक सुविधा सुरू
भारतीय डाक विभागाने 650 पोस्ट कार्यालयांमधून इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत कोणत्याही बँकेच्या खातेदाराला पोस्ट ऑफिसमधून आधारलिंक प्रणालीद्वारे पैसे काढणे शक्य होणार आहे. जिल्हय़ात अनावश्यक फिरणाऱया 53 वाहनचालकांवर कारवाई करत ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्हय़ात संचारबंदी काळात एकूण 35 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
48 निवारा केंद्रे
जिल्हय़ात एकूण 48 निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात 64 लोकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाभरात 680 जणांच्या भोजनाची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी आहे तेथेच थांबावे त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आकाशवाणी प्रसारण सुरू
रत्नागिरी आकाशवाणीचे प्रसारणही मंगळवारपासून सुरू झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध भारतीचे कार्यक्रम व प्रादेशिक-राष्ट्रीय बातम्या प्रसारीत होत होत्या. मंगळवारपासून मात्र नियमित कार्यक्रम सुरू झाले आहेत.