प्रतिनिधी / निपाणी
कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हय़ात सतर्कता बाळगण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांनी केलेल्या सूचनेनुसार निपाणी तालुक्यातही भरणाऱया बाजार तसेच विविध यात्रांना 31 मार्चपर्यंत बंद घालण्यात आली आहे, असा आदेश तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात निपाणी तालुक्यात परदेशातून तसेच अन्य राज्यातून आलेल्या व्यक्तीने 14 दिवस घराबाहेर पडू नये, तालुक्यात सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा विषयक उपक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. उन्हाळी शिबिरेही कोणाला घेता येणार नाहीत. सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱयांनी सार्वजनिक लोकांपासून कांहीसे अंतर राखून रहावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. सदर आदेशाच्या प्रती सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
70 टक्के आंतरराज्य बसेस स्थगित
कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने नागरिकांनी सार्वजनिक बससेवेद्वारे प्रवास करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम म्हणून निपाणी आगाराचे दररोज सुमारे 2 लाखांनी उत्पन्न घटले आहे. तसेच येथून सुमारे 70 टक्के आंतरराज्य बसेस स्थगित करण्यात आल्या आहेत. बस वाहतूक थांबविण्याचा आदेश आल्यास निपाणीतून महाराष्ट्रात जाणाऱया सर्वच बसेस थांबविण्यात येतील, असे आगार व्यवस्थापक मंजुनाथ हडपद यांनी सांगितले आहे. सीमावर्ती प्रमुख बसस्थानक असूनही निपाणी आगारात प्रवाशांची नाममात्र वर्दळ दिसून येत आहे.
रेशनकार्डवरील थंम्बला तात्पुरती स्थगिती
रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण करताना कार्डवरील एका व्यक्तीच्या अंगठय़ाचे ठसे अर्थात थंम्ब आवश्यक आहे. मात्र कोरोना विषाणूची लक्षणे पाहता राज्य सरकारने थंम्ब सुविधेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे थम्ब ऐवजी नेंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळणाऱया ओटीपी क्रमांकाच्या आधारे रेशनकार्ड धारकांना धान्य पुरविण्यात येणार आहे.