विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
प्रतिनिधी/मुंबई
ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करा, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांसह, जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
बुधवारी मुख्यमंत्री सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकार्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते.अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी राज्य सरकारने दुर्बल घटकातील तसेचा गरीब लोकांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहचवावी तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंर्त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा या कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे .
ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा , वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे . सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंर्त्यांनी यावेळी दिल्या .
विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठÎा प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षत आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असेही ते म्हणाले.याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या.