सततच्या भक्तीने भगवंतांचा वावर जाणवायला लागतो आणि वातावरण सुगंधित होते. कारण फुलाला सुवास देणारा स्वतः हजर होतो. त्याची चाहूल नाकाला लागते मग घ्राणेंद्रिय समर्पण व्हायला कितीसा उशीर! म्हणतात ना, ‘भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, तुझा देव येतो तुला भेटण्यास, नित्य घडो देवा तुझा सहवास’ जीभ रसाचा आस्वाद घेऊ लागली की देव स्वतः रसास्वाद होतो आणि रसनेत येऊन राहतो. रस रसना आणि रसास्वाद असा एक अभिन्न आत्माच होतो, या भावनेने रस सेवन केला की परमानंद प्रकट होतो आणि रसनेंद्रिय ब्रह्मार्पण होते. हाताने ज्याला ज्याला स्पर्श करायला जातो ते ते भगवंत स्वरूप आहे असे जाणवते. जो जो पदार्थ घ्यायला जावा तो तो भगवंत स्वरूप वाटतो. पायांनी चालायला जावे तो मार्गच देवरूप होतो आणि चालण्याचे कर्म आपोआपच ब्रह्मार्पण होते. अशा प्रकारे सगळीकडेच भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते.
मला तुम्ही सगळे रामरूपच दिसता’ असे श्रीमहाराज म्हणायचे, कारण त्यांनी काया, वाचा, मने त्यांचे सर्वस्व भगवंताला अर्पण केले होते. साहजिकच त्यांची अकराही इंद्रिये, भगवंतांचा स्पर्श, गंध आणि रूप अनुभवत होती. त्यामुळे समोर जो जो दिसतोय तो, मग ती जिवंत व्यक्ती असुदे वा निर्जीव वस्तू त्यांना रामस्वरूपच वाटत होती. श्रीमहाराजांच्या गूढ बोलण्याचा असा उलगडा झाल्यावर, आपली अशी स्थिती येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, अकराही इंद्रिये भगवंतांना कशी अर्पण करायची तेही नाथांनी आपल्याला सांगितले. मागील भागात आपण ते पाहिले. अशी स्थिती प्राप्त झाल्यावर, ‘आपल्याला जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू’ दिसू लागतील. सर्वस्व अर्पण करून भगवंताची भक्ती करताना भक्ताच्या डोक्मयात एकच विचार असतो तो म्हणजे सर्व लोकांमध्ये त्याचीच सत्ता आहे. सर्वांचा शास्ता, नियंता तोच आहे. हाच विचार सतत मनात ठेवून तो आपल्या नियंत्याबद्दल अभिमान बाळगून त्यासमान होण्याचा प्रयत्न करत करत आपणच भगवंतस्वरूप झालो आहोत अशीच अनुभूती घेत असतो. म्हणजेच ‘अहं ब्रह्मास्मी’ स्थिती!
जे जे सहजप्राप्त होत नसते त्याचेच चिंतन, चित्त एवढय़ा एकाग्रतेने करत असते की, आपण तोच झाल्याची भावना होते व पुढे भजन आपोआप घडू लागते. मग चित्त, चिंत्य आणि चिंतन या त्रिपुटीचे ऐक्मय झाले की, समाधान होते आणि मग ते समाधानसुद्धा कृष्णार्पण होते. हीच समाधी अवस्था होय!
या व्याख्येप्रमाणे बघायला गेलो तर थोर थोर ऋषीमुनी, संत महात्मे हे कायम समाधी अवस्थेत कसे असतात याचे कोडे उलगडते. सर्व कर्मामध्ये चित्ताचे समाधान ठेवणे हीच युक्ती सद्गुरु सांगत असतात. अशी भगवंतांच्या स्वरूपामध्ये दृष्टी तन्मय होऊन गेली म्हणजे भक्ताच्या हृदयात सर्वांबद्दल समबुद्धी निर्माण होते. अशा स्थितीचे नाव परमसमाधी होय! मी देह आहे ही भावना नष्ट झाली की सर्व प्रकारचा अहंकार नाहीसा होतो. ती ‘निर्दोष परमसमाधी’ होय.
क्रमशः