‘ये मंझिले है कौनसी, कहा शुरू कहा खतम्! असे म्हणत चाचपडत बघता बघता प्रसन्न मनाने निरोप घेण्याची वेळ आलेली आहे जवळजवळ गेल्या सहा-सात महिन्यांपासून ‘अक्षरयात्रे’मधून तुमच्या भेटीस येत होतो. आता निरोप घ्यावाच लागेल. पत्रकारितेचे अर्धशतक पूर्ण केले. या वाटचालीमधील अनुभवलेले क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवणे यामध्ये माझी काही अपेक्षा नाही, अथवा त्यामधून काहीही साध्य करायचेही नाही. किंबहुना या कालावधीत जे जे घडले ते सांगावे, इतकाच माफक हेतू! यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते की, केवळ एकाचं विचारांचे मळे फुलवण्याचाही हेतू नव्हता. माझ्या परीने प्रामाणिकपणे लिहित गेलो! मला जेथंपर्यंत आकलन होत गेले तीच चौकट! लक्ष्मणरेषा ओलांडण्याचे भलते धाडसही करण्याचा खटाटोप टाळला आणि वाचकांनीही भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कधी कधी रविवारी सकाळी आठ-साडेआठ वाजताच भ्रमणध्वनीवरून संदेश येऊ लागायचे. दुसऱया दिवशी सोमवार वा मंगळवारीही मराठवाडय़ाच्या एका टोकाला असलेले लातूर! ध्यानीमनी नसताना तेथील प्राध्यापकांनी संवाद साधून प्रशंसोद्गार काढले. सोलापूर जिल्हय़ातील माळशिरस, अकलूज परिसरातूनही असेच! नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील पाठक, रत्नागिरी येथील आकाशवाणी केंद्रातील विद्वंस यांनी काही अनुभव कथन केले. याच शहरातील विचारवंतांनीही मन मोकळे केले. तर सांगायचे म्हणजे मिळालेला प्रतिसाद नक्कीच अपूर्व होता. या पार्श्वभूमीवर आढावा घेत असताना मला काही वेचक प्रतिक्रियाची नोंद घ्यावीच लागेल.
1970 अखेरीस लोकसभेचे विसर्जन आणि लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक खऱया अर्थाने गाजली. निवडणूक रंगतदार झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन धारिया यांनी विजयश्री खेचून आणली. ‘गरिबी हटाव’चा नारा त्यावेळी मतदारांच्या हृदयाला भिडणारा होता. साहजिकच धारियांना विजय मिळाला खरा, पण त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते! 1967 या निवडणुकीत साथी एस. एम. जोशी यांचा लोकसभेत प्रवेश झाला. त्या अनुषंगाने मी मोहन धारिया विरुद्ध एस. एम. जोशी अशी लढत झाल्याचे अनुमान काढले आणि प्रसिद्धही झाले. पण एका रविवारी सकाळीच कोल्हापुरातून ज्ये÷ वाचकांचा भ्रमणध्वनी! ‘तुम्ही लिहिले ते अगदी बरोबर! तत्कालीन परिस्थितीचे आकलन योग्य. मांडणी अचूक तरीदेखील एक चूक! ती कोणती अशी विचारणा करताच ते म्हणाले, ‘अहो, एस. एम. जोशी रिंगणात नव्हतेच! मोहन धारिया विजयी झाले ही वस्तुस्थिती असली तरी त्याच्या विरोधात कोण होते याची तुम्हीच माहिती मिळवा.
यामुळे मी भांबावून गेलो. 1971 मधील मुदतपूर्व निवडणुकीतील पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची माहिती गोळा केली. उणेपुरे एक महिन्याच्या प्रातीक्षेनंतर उलगडा झाला. मोहन धारियांच्या विरोधात उमेदवार होते, ते जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी!
हे म्हाळगी कोण? 1957 च्या विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून रामभाऊ म्हाळगी जनसंघाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. मात्र 1962 मधील निवडणुकीची पुण्यातील एका मतदारसंघातून स. गो. बर्गे कडून (काँग्रेस) त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचा वचपा त्यांनी 1967 च्या विधानसभा निवडणुकीत काढला होता. सामाजिक आर्थिक आणि पुणे शहरातील प्रश्नांची जाण म्हणून म्हाळगी नावारुपाला आले होते. या पार्श्वभूमीवर 1971 च्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत जनसंघाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. यामुळे मोहन धारिया विरुद्ध रामभाऊ म्हाळगी ही लढत चुरशीची झाली. तथापि ‘गरिबी हटाव’च्या जादूमुळे मोहन धारिया यांनी बाजी मारली. यावेळी सांगण्याची गरज भासली, ती कोल्हापुरच्या चाणाक्ष ज्ये÷ वाचकामुळे. आता त्यांचे नाव लक्षात नाही. मात्र मला ती दुरुस्ती केलीच पाहिजे हाच काय तो एकमेव अपवाद.
आणीबाणीतील नसबंदीचे चटके
1975 मधील आणीबाणी पर्व विसरता न येणारे? या पर्वातील नसबंदी मोहीम संतापजनक. त्याचे पडसाद तीव्रतेने उमटले. या संदर्भातील प्रतिक्रियादेखील बोलक्मया होत्या. गोव्यातील मागास अशा काणकोण परिसरातील श्री. टेंगसे या वाचकाने भरभरून अनुभव कथन केले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर माझे एक नातेवाईक रेल्वेने दिल्ली यात्रेवर निघाले होते, त्यावेळी माझे तिकीट हरवले. उत्तर भारतातील एका स्टेशनमास्तरने त्याबद्दल माझी झाडाझडती घेतली. विनातिकीट प्रवासाबद्दल दंड करण्याऐवजी नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात माझी रवानगी केली आणि शस्त्रक्रिया करून घेण्यास भाग पाडले. मी परतलो आणि मी उद्ध्वस्त झालो, असे म्हणून त्या वाचकाने सांगितले, अहो त्याचा वंश खुंटला. संबंधीत नसबंदी शस्त्रक्रियाग्रस्ताचे नाव मी येथे देत नाही! हा अनुभव सुन्न करणारा होता.
आणीबाणी विरोधातील आंदोलन
आणीबाणी विरोधातील आंदोलन आणि त्यानंतर 1977 मधील लोकसभा निवडणुकादरम्यानच्या संघर्षातील घटना विलक्षण प्रभावी ठरल्या. कोल्हापूर, सांगली भागातील वाचकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील सभांना मिळणाऱया प्रतिसादांबद्दल हे वाचक एका मागून एक आठवणी सांगत गेले. तुम्ही जे काही लिहिले ते ‘शंभर नंबरी’ अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
पुलोद मंत्रिमंडळ आणि बरेच काही
1978 ते 1980 महाराष्ट्रात या कालावधीतील राजकारण ढवळून निघाले! ज्ये÷ नेते वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील हे दोघे केंद्रस्थानी होते तर शरद पवार सूत्रधार! पुलोद सरकार कसे आकाराला आले आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना दक्षिण महाराष्ट्रातील वाचकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व. सांगली जिल्हय़ातील वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या सुपुत्राने माझा नंबर घेऊन विचारपूस केली आणि धन्यवाद दिले ते कशासाठी! तुम्ही स्पष्टपणे आणि तटस्थपणे लिहिल्याबद्दल. तसाच अनुभव आला, जतमधील एका वाचकाने बहुधा त्यांचे आडनाव ‘कोळी’ असावे!
चिकोडीमधूनही
तीन-चार महिन्यापूर्वी दुपारच्या सुमारास भ्रमणध्वनीतून हाक आली. चिकोडी जिल्हा महिला काँग्रेसच्या एका विदूषीने मन:पूर्वक अभिनंदन केले. मात्र चालू घडामोडींबद्दल भाष्य का करीत नाही, असा त्यांचा प्रश्न होता. तेव्हा त्यांना समजावून सांगितले, हा माझा अर्धशतकापर्यंतच्या वाटचालीचा आढावा आहे. तेव्हा कोठे त्यांचे समाधान झाले.
जोशी-अभ्यंकर हत्याकांड
हत्याकांड, खून, अपघात यासारख्या घटकांना हेडलाईनची बातमी म्हणून आजच्या जमान्यात ठळक प्रसिद्धी मिळत असते. मात्र पन्नास वर्षापूर्वी क्राईम संदर्भातील वृत्तांची गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर 1976- 1977 च्या दरम्यान जोशी-अभ्यंकर हत्याकांडाने केवळ पुणे शहर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. इतकेच नव्हे तर देशभर चर्चा झाली. सदर हत्याकांडांची दखल ‘अक्षरयात्रे’तून घेतली. त्यावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच. कोल्हापूर-सांगली-कोकणाबरोबरच बेळगाव येथूनही. बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील एक वाचक रॉड्रीग्ज यांनी आवर्जून संपर्क साधला आणि यासंदर्भातील तपशीलाबद्दल विचारणा केली.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न
गेल्या 64 वर्षापासून लोंबकळत असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक सीमाप्रश्नाचा संक्षिप्त आढावा याच सदरातून घेतला. अपेक्षेपेक्षाही मोठय़ा संख्येने दाद मिळाली. वेंगुर्ला येथे ( सिंधुदुर्ग) स्थायिक असलेल्या रॉक्सन फर्नांडिस या ज्ये÷ व्यक्तीने यासंदर्भातील आठवणी कथन केल्या.तब्बल पंधरा मिनिटे भ्रमणध्वनीवरून बोलते झाले. वय वर्षे 82 असलेल्या या जागरुक व्यक्तीने आपली स्मरणगाथाच ऐकवली. 1970 च्या दशकातील बेळगावातील गोंधळी गल्लीत वास्तव्य. साहजीकच सीमाप्रश्नावर पहावयास मिळालेली कर्नाटकी प्रशासनाची ठोकशाही, दडपशाहीचे वर्णनच त्यांनी केले. त्यानंतर आपण गोवा आणि या घडीला वेंगुर्ले येथे स्थानिक असल्याचे सांगितले.
निवृत्त लष्कर प्रमुख स्व. अरुण वैद्य
निवृत्त लष्कर प्रमुख अरुण वैद्य यांची हत्या चटका लावणारी ठरली. ‘अक्षरयात्रे’तील वरील प्रसंगाची दखल निवृत्त जवानांनी घेतली आणि माझ्याशी संपर्क साधून हळहळ व्यक्त केली. त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
या वेचक उदाहरणांचा येथे उल्लेख करीत आहे. अन् किंबहुना जुलै ते अगदी 26 जानेवारीपर्यंत साऱयाच सदरांना प्रतिसाद लाभला आपण कोठे आहात, पुणे की मुंबई वा अन्यत्र तेव्हा स्पष्टीकरण झाले. यापैकी काही मान्यवरांनी आपण बेळगाव येथे तुमच्याशी गप्पा मारू आणि माहिती मिळवू अशी पुस्ती जोडली.
खरोखरच मला हा स्तंभ लिहिण्याची संधी मिळाली. ‘आपणाशी जे जे ठावे ते इतरांना द्यावे’, या उक्तीचाच विचार करून मांडणी केली. तरुण भारतचे संपादक सल्लागार श्री. किरण ठाकुर आणि ‘अक्षरयात्रा’ पुरवणीचे संपादक प्रसाद विजय प्रभू यांना लाख लाख धन्यवाद. लेखनप्रपंच यापुढेही राहील.
जीवनगाणे गातच रहावे,
झाले गेले विसरुन जावे,
पुढे पुढे चालावे! असे म्हणत.
(समाप्त)
जयवंत मंत्री
मो. 9342164313