देशात कोरोना निर्बंध, 31 मार्चपासून शिथिल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील बहुतांश कोरोना निर्बंध 31 मार्चपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील काही तरतुदी रद्द केल्या आहेत. मात्र, कोविड प्रतिबंधात्मक उपायांवरील प्रयत्न सुरुच राहणार असून नियमित मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने 24 मार्च 2020 रोजी देशात निर्बंध लागू केले होते.
यशस्वी लसीकरण मोहिमेनंतर देशात कोरोना संसर्गात घट झाली आहे. साहजिकच लवकरच कोरोना महामारीमुळे लादलेले सर्व निर्बंध हटवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वीचे बहुतांश निर्बंध 31 मार्च 2022 रोजी संपतील, तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असेल. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे.
सक्रिय रुग्णसंख्या 23 हजारांवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱयांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे. सध्या देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडय़ात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सोमवारी दिवसभरात देशात 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णकपातीमुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे. आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
लसीकरणाचा सकारात्मक परिणाम भारतात लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. आताही 12 ते 14 वयोगटातील लसीकरण सुरू असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत 182 कोटी डोस देण्यात आले आहेत. यशस्वी लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱया लाटेवर भारतीयांनी मोठी जीवितहानी टाळत मात केली. तथापि, कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्मयता आहे. मात्र, बूस्टर डोस किंवा अन्य कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत करून घेतल्यास देशात येणारी चौथी लाट सौम्य असेल, असे अंदाज बांधले जात आहेत