खा. सार्दिन यांची सरकावर टीका
प्रतिनिधी/ मडगाव
Qभाजप सरकार दरवेळी निवडणुका जवळ आल्या की नोकऱया देण्याचे व खनिज व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन जनतेला देतात. पण, निवडणुका संपल्या की, त्यांना नोकऱया देणे व खनिज व्यवसाय सुरू करण्याचा विसर पडतो अशी टीका दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
सरकारच्या आरोग्य खाते, वीज खाते तसेच इतर खात्यांनी गोव्यातील शेकडो युवक नोकऱया करीत आहेत. काही जण पाच वर्षे तर काही जण तीन वर्षे नोकरी आहेत. ते एक तर रोजंदारीवर किंवा कंत्राटपद्धतीने काम करतात. जर सरकार खरेच जनतेसाठी काम करीत असेल तर पाच वर्षापेक्षा अधिक काळ सरकारी खात्यात काम करणाऱयांना सेवेक कायम करावे, गरज भासली तर त्यांची पुन्हा मुलाखत घ्या, परंतु त्यांना सेवेत कायम करा अशी मागणी खा. सार्दिन यांनी यावेळी केली.
नव्याने नोकर भरती करून जे पाच-सहा वर्षापासून सरकारी सेवेत काम करतात, त्यांना बाजूला ठेऊन त्यांच्यावर अन्याय करू नका. आपण मुख्यमंत्री असताना ज्यांनी पाच वर्षे व अधिक काळ सरकारी सेवेत काम केले होते, त्या सर्वांना सेवेत कायम केले होते असे खा. सार्दिन म्हणाले. युवकांना खोटे आश्वासने देऊन मुलाखतींना बोलावू नका व भलत्यानाच सेवेत कायम करू नका असे ते म्हणाले.
नाणूस-उसगांव येथे पुराचे पाणी घरात घुसून ज्यांची घरे जमीनदोस्त झाली होती. त्यांना सरकारने अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही. नुकसान भरपाई देताना सरकार कुणावर मेहरबानी करत नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला 300 कोटी रूपये दिलेले आहेत. त्याच निधीतून सरकारने मदत करावी असे खा. सार्दिन म्हणाले.
संजीवनी साखर कारखान्याचे कामगार आपल्या मागण्यासाठी संपावर गेलेले आहेत. सरकारने त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण केलेले नाही. सरकार खोटी आश्वासने का देतात हे आपल्या कळत नाही. गणेश चतुर्थी पूर्वी संजीवनीच्या कामगारांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. या कामगारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पैसे देण्यात यावे. ते मळविण्यासाठी त्यांना येथून तिथे धावपळ करण्यास भाग पडू नये.
सरकारने असंघटीत घटकांसाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते व तसे अर्ज ही त्यांना दिले होते. मात्र, अर्ज भरून दिले तरी त्यांना निधी दिला जात नाही. त्यांनाही शक्य तेव्हढय़ा लवकर सरकारने मदत करावी, जेणे करून त्यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल.
खनिज प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने आपला निवाडा दिलेला आहे. या निवाडय़ानंतर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी व लवकरात लवकर खनिज व्यसाय सुरू करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारने रतीचा प्रश्न देखील लवकर सोडवावा. रेती शिवाय बांधकाम करता येत नाही. रेती उत्खनानासाठी ठराविक जागा निश्चित कराव्यात व कायदेशीर पद्धतीने रेती व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे रेती व्यवसायावर काही सरकारी अधिकारी व पोलीस भ्रष्टाचार करतात तो देखील बंद होईल असे खा. सार्दिन म्हणाले.
लाठीचार्जचा निषेध
युवा काँग्रेसचे कार्यकर्ते वाढत्या महागायीच्या विरोधात रस्त्यावर उतरले, यात गैर असे काहीच नव्हते. महागायीमुळे जनता हैराण झालेली आहे व जनतेच्या हिताचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय हा अत्यंत निदंनीय प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा व दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस उपस्थितीत होते.