नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक्समध्ये भारतीय क्रीडापटूंनी साकारलेल्या देदीप्यमान, लक्षवेधी कामगिरीचे प्रतिबिंब यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केलेल्या शिफारशीत उमटले. सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवि दहिया व आघाडीची महिला मुष्टियोद्धा लोवलिना बोर्गोहेन यांच्यासह 11 क्रीडापटूंची बुधवारी प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली गेली. रवि दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर लोवलिनाने कांस्य जिंकले आहे.
अनुभवी हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेश, महिला कसोटी संघाची कर्णधार मिताली राज, आघाडीचा फुटबॉलपटू सुनील चेत्री यांचाही यावेळी गौरव केला जाणार आहे. टोकियो पॅरालिम्पिक्समधील पाचही सुवर्णजेते अवनी लेखरा, मनीष नरवाल (नेमबाजी), सुमित अन्टिल (ऍथलेटिक्स), प्रमोद भगत, कृष्णा नगर (बॅडमिंटन) यांचीही अंतिम निवडीसाठी शिफारस केली गेली.
भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी 121 सदस्यांचे आजवरचे सर्वात मोठे पथक पाठवले आणि भारतीय क्रीडापटूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 7 पदके जिंकत तो विश्वास सार्थ ठरवला होता. बजरंग पुनिया, पीव्ही सिंधू व मिराबाई चानू यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराचे विजेते ठरले आहेत. पॅरालिम्पिक्समध्ये भारताने यंदा 19 पदके जिंकली असून त्यात 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्यपदकांचा समावेश आहे.
निवड समितीने याशिवाय, 35 ऍथलिट्सची अर्जुन पुरस्कारासाठी देखील शिफारस केली. क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबलटेनिसपटू भाविना पटेल, पॅरा शटलर सुहास यथिराज, उंच उडीपटू निशद कुमार यांचा यात समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया भारतीय हॉकीपटूंचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.