राजापुरात मंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही
राजापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराची सुरूवात रायगडावरून केली होती. तशीच मदतीची सुरूवातही कोकणातून करा.. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रालाही तातडीने मदत करावी असे सांगतानाच कोणीही नाराज होणार नाही, अशी भरघोस मदत राज्य सरकार करेल. येत्या 8 दिवसात मदत वाटपास सुरूवात होईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळात शेती, बागायती, घर, गोठे यांचे मोठे नुकसान झाले. या वादळात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, जखमींना तातडीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेती व मालमत्तेच्या भरपाईपोटी कोकणाला भरीव मदत झाली पाहिजे. ही शासनाची भूमिका असून लवकरच मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळात 200 कोटीची भरघोस मदत निकष बदलून आपद्ग्रस्तांना देण्यात आली होती. तशीच मदत यावेळीही करण्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली. केंद्राने पाहणी पथक पाठवावे आणि तातडीने मदत करावी, असे विनंतीपत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांदर्भातही शासन धोरण ठरवत आहे. त्यात भूमिगत वीजवाहिन्या, लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची व्यवस्था, किनारपट्टीवरील धोकादायक घरांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण राबवण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी सर्व अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे नेते अविनाश लाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे आदी उपस्थित होते.