राज्य सरकारकडून मार्गसूची जारी : जिल्हाधिकाऱयांना अधिकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मागील पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून अनेक जिल्हय़ांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घरे, वस्तू गमावलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मदतकार्य सुरू केले आहे. नुकसानग्रस्तांसाठी मदतीचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. शनिवारी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.
पावसामुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीनुसार राज्य सरकारने मदतीचे स्वरूप निश्चित केले आहे. पावसामुळे घराची पडझड होऊन कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाल्यास केंद्राच्या मार्गसूचीनुसार संबंधित कुटुंबाला तातडीने 3,800 रुपये तसेच राज्य सरकारकडून अतिरिक्त 6,200 रुपये अशी एकूण 10 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
‘अ’ गटात समाविष्ट होणाऱयांना म्हणजेच घराचे 75 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना किंवा संपूर्ण घर कोसळल्यास नवे घर बांधण्यासाठी केंद्राच्या एनडीआरएफ मार्गसूचीप्रमाणे 95,100 रुपये आणि राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याची सूचना आदेशपत्रकात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ‘ब’ गटात समाविष्ट होणाऱया नुकसानग्रस्तांना म्हणजेच घराचे 25 ते 75 टक्के नुकसान झाल्यास दुरुस्तीकामांसाठी 75,100 रु. तसेच राज्य सरकारकडून 3 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर 15 ते 25 टक्क्यांपर्यंत घराची किरकोळ हानी झाल्यास केंद्र सरकारकडून 5,100 रु. तर राज्य सरकारकडून राज्य सरकारकडून 50 हजार रु. देण्याची सूचना करण्यात आली आहे.
मदतीची रक्कम थेट नुकसानग्रस्तांच्या खात्यावर
केंद्राच्या एसडीआरएफ, एनडीआरएफ मार्गसूचीपेक्षा राज्य सरकारने अतिरिक्त मदतीची घोषणा केली आहे. मदतीची रक्कम देताना जिल्हाधिकाऱयांनी काही अटींचे सक्तीने पालन करावे, अशी सूचनाही राज्य सरकारने केली आहे. मदतीची रक्कम थेट नुकसानग्रस्त कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा करावी, कुटुंबनिहाय मदतीची रक्कम वापरल्याचे प्रमाणपत्र द्यावे, पूर किंवा पावसामुळे घरे गमावलेल्यांना राजीव गांधी वसती निगममार्फत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामार्फत बँक खात्यावर रक्कम जमा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
परवानगीची वाट बघू नका!
पावसामुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त भागात तातडीने मदतकार्य हाती घेण्यासाठी परवानगीची वाट बघू नका. तातडीने स्वतः निर्णय घेऊन मदतकार्य सुरू करा, अशी सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिली आहे. कोरोना संसर्गामुळे बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात उपचार घेत असल्यामुळे येडियुराप्पा यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनाच निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. राज्यातील कावेरी खोरे, मलनाड भाग, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक भागात जोरदार पाऊस होत असऱयाने पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे संकटात असलेल्यांच्या मदतीसाठी आपल्या परवानगीची प्रतीक्षा करू नका, तातडीने निर्णय घेऊन मदतकार्य सुरू करा, अशी सूचना येडियुराप्पा यांनी मुख्य सचिवांना दिली आहे.