ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी, नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारे मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत असल्याची घोषणा आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
या पॅकेज अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी 1000 कोटी, रस्ते आणि पुलासाठी 2 हजार 635 कोटी, फळ पिकांच्या नुकसानासाठी हेक्टरी 25 हजार, नगर विकासाठी 300 कोटी, जलसंपदा 102 कोटी, महावितरण 239 कोटी, कृषी आणि घरासाठी 5 हजार 500 कोटी, जिरायत, बागायत नुकसानासाठी हेक्टरी 10 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तर मृतांच्या वारसांना देखील मदत करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले, साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. 9 हजार 800 कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत. राज्याचे केंद्राकडून जवळपास 38 हजार कोटी रुपये एकूण येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – 1 हजार 65 कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भात पूर – 800 कोटी रुपये बाकी आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पण पैसे आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
ते म्हणाले, हे 10 हजार कोटी रुपये विविध कारणासाठी जाहीर करण्यात आले आहे. तसेच ही पूर्ण मदत दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या पैशाची ओढाताण आहे, पण आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच केंद्राने दूजाभाव न करता सर्व राज्यांना मदत करावी, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.