कळणे गावावरील मायनिंग संकट : अजूनही धोका कायम : ..सारे विकून घर बांधले, पण..!
तेजस देसाई / दोडामार्ग:
वार शुक्रवार, वेळ सकाळची. एक ज्येष्ठ ग्रामस्थ हातात फावडे घेऊन अंगण साफ करीत होते. ते पाहून आम्ही या कुटुंबाची वस्तुस्थिती जाणून घेतली. हे कुटुंब साफसफाई नव्हे, तर मायनिंगची ‘घाण’ साफ करीत होते. त्यांनी घेतलेली जमीन, बांधलेले घर याला कष्टाची किनार आहे. या कुटुंबाने आपली गुरे-ढोरे, शेळी-बकऱया विकल्या आणि स्वतःचे घर बांधू शकले. हे कुटुंब आहे कळणे येथील. मायनिंगची माती वाहून येऊन कळणेत जो गुरुवारी प्रकार घडला, त्याचे बाधित हे शेळके कुटुंब. सारं काही विकून त्या ठिकाणी स्थिरावलेल्या या कुटुंबाची शोकांतिका चटका लावणारी आहे. ते म्हणतात, पाठीमागील मायनिंग पाहता ‘भीतीचा डोंगर’ आमच्यावर कायम आहे.
कळणे येथे मायनिंगचा बांध फुटला आणि अक्षरशः हाहाकार उडाला. साधारण बारा वर्षांपूर्वी भविष्यातील धोका ओळखून मायनिंगला विरोध झाला होता. मात्र अखेर गुरुवारी व्हायचे तेच झाले. तब्बल बारा वर्षांनी मायनिंगच्या दुष्परिणामांचा पहिला आघात कळणे गावावर झालाच. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. अनेकांची शेती-बागायती नापीक झाली, तर घरांना धोका उद्भवला आहे. पैकी बाबल विठोबा शेळके यांचे एक प्रातिनिधिक कुटुंब. त्यांची ही व्यथा.
शेळ्य़ा-बकऱया, गुरे-ढोरे विकून घेतली जमीन
कळणे गावच्या ‘सडा’ या ठिकाणी हे शेळके कुटुंब जवळपास 40 वर्षे राहिले. मात्र त्या जागेची मालकी दुसऱयाची असल्याने कुटुंबप्रमुख बाबल विठोबा शेळके यांनी आपल्या मुलांना हक्काची जमीन व घर असावे म्हणून गावात सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी तेरा गुंठे जमीन घेतली. शेळके यांचा शेळी-बकरी पालनाचा व्यवसाय. त्यामुळे त्यांच्याकडे शेळय़ा-बकऱयांसोबत गुरेढोरे होती. मात्र त्यांनी संपूर्ण गोठा साफ करून सगळे पाळीव प्राणी विकले आणि कळणे गावात हक्काची जमीन घेतली. त्या ठिकाणी छोटेसे घरकुल उभारले. यामध्ये त्यांना पारंपरिक व्यवसाय बंद करून मोलमजुरी पत्करावी लागली. मात्र त्यांनी तो निर्णय घेत आता मोलमजुरीवर कुटुंबाचा गाढा ओढत आहेत.
दुसऱया दिवशीही मायनिंगच्या घाणीची सफाई
शेळके यांच्या घरासभोवती आणि लावलेल्या नाचणी पिकात मायनिंगची लोहयुक्त माती, कचरा, घाण साचली. शुक्रवारी सकाळपर्यंत ते घराच्या अंगणातील माती साफ करण्याचे काम करीत होते. शेळके यांचे घर मायनिंगच्या जवळ असून अन्य बरीच घरे तशी असून त्यांचीही तीच परिस्थिती आहे. सध्या तर काही पॉईंटमध्ये साधा बांध फुटून एवढा धोका निर्माण झाला, तर आणखी असे अनेक धोकादायक मातीचे डोंगर असून भीतीचा डोंगर कळणे गावावर टांगत्या तलवारीसारखा आहे.
कायद्याची पायमल्ली
निसर्ग मित्र विठ्ठल शेळके म्हणाले, वन संरक्षण कायदा 1986 नुसार राखीव जंगलाच्या एक किलोमीटरपर्यंत उत्खनन करता येत नाही. सदर खोदकाम ‘रॅटहोल’ पद्धतीने करून राखीव क्षेत्रावरही मायनिंग कंपनीने कब्जा केला असून नियमांची पायमल्ली केली असून त्यांच्यावर कारवाईसह मायनिंग बंद व्हावे व भविष्यातील धोका टाळणे गरजेचे आहे.
पुढील दहा वर्षे तरी शेती नापीक
कळणे मायनिंगमधून वाहून आलेली आणि शेतात साचलेली ती फक्त माती नाही, तर लोहयुक्त माती आहे. त्यामुळे लोहाचा तेल सदृश द्रव मातीत मिसळला आहे. इतर शेतकऱयांप्रमाणे शेळके यांच्या शेत जमीन या ठिकाणी मातीचे निरीक्षण केले असता मातीत तेलाचा थर आढळतो. कृषी अभ्यासकांच्या मते अशी माती साधारण दहा वर्षे तरी पिकास नापीक आहे. त्यामुळे शेळके यांच्यासह इतर शेतकयांचे झालेले नुकसान फक्त आजचे नसून पुढील कमीत कमी दहा वर्षापर्यंतचे आहे.