वाराणसी / वृत्तसंस्था
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांची पत्नी अर्जू राणा देउबा यांनी रविवारी काशी-पशुपतीनाथाचे दर्शन घेतले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी येथे त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत 40 सदस्यीय शिष्टमंडळही गेले आहे. नेपाळचे पंतप्रधान देउबा यांनी त्यांच्या पत्नीसह काशी विश्वनाथ, बाबा कालभैरव आणि पशुपतीनाथ मंदिरात पूजा केली. या दौऱयादरम्यान खास नेपाळीयन संस्कृतीच्या आदरातिथ्याने देउबा दाम्पत्य भारावून गेले होते. नेपाळ आणि भारताचे जुने नाते आहे. इथे आल्यावर दुसऱया देशात आल्यासारखे वाटत नाही. जणू आपणच आपल्या घरात प्रवेश केल्यासारखे वाटते, असे नेपाळचे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळी पंतप्रधानांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यानंतर ते काशी विश्वनाथ आणि बाबा कालभैरव मंदिराकडे निघाले तेव्हा त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळावरून शहरात येताना देउबांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच लोकनृत्य आणि संगीतपर कार्यक्रम सादर करण्यात आले होते. वाराणसीत देउबा यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी मयुरपंखी नृत्य, वली, पायदंडा लोकनृत्य झाले. त्याचवेळी सोनभद्रच्या आदिवासींनी सरायकाजी बसस्थानकावर लोकनृत्य सादर करून नेपाळच्या पंतप्रधानांचे स्वागत केले.
तरणा येथील सेठ जयपुरिया शाळेच्या गेटवर नटवरी लोकनृत्य, संत अतुलनंद तिरहा येथील सोनभद्राचे आदिवासी नृत्य, सर्किट हाऊस येथे बुंदेलखंडचे राय नृत्य, अवधचे धोबिया आणि पोलीस लाईन चौकात पूर्वांचलचे फारुवाही लोकनृत्य सादर करत कलाकारांनी पंतप्रधान देउबा यांचे स्वागत केले. देउबांचा ताफा कचरी आणि ताज हॉटेल तिराहे येथे पोहोचला, तेथे त्यांचे आदिवासी आणि मयुरपंखी लोकनृत्यांसह स्वागत करण्यात आले. चौकघाट येथे कस्तुरी बीन आणि धोबिया लोकनृत्ये, लहुराबीर क्रॉसिंग येथे विविध लोकनृत्ये, मैदागीन चौकात मोरनृत्य आणि बम रसिया (नगाडा) सादर करण्यात आले.
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा शुक्रवारी तीन दिवसांच्या भारत दौऱयावर नवी दिल्लीत दाखल झाले होते. या दौऱयात त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत द्विपक्षीय संबंधांना बळकटी दिली आहेत. तसेच नेपाळच्या शिष्टमंडळाने विविध पातळीवर द्विपक्षीय चर्चा केली आहे. देउबा यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्जू राणा देउबा, चार कॅबिनेट मंत्री, सरकारी सचिव, वरि÷ अधिकारी आणि उद्योगपती यांच्यासह एकूण 50 जणांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. जुलै 2021 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ते पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले आहेत.