भारतातून पोहोचल्याचा संशय – 4 जणांना अटक
वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तस्करी करून पोहोचलेले अडीच किलोग्रॅम संपृक्तीकृत नसलेले युरेनियम मिळाल्याने खळबळ उडाली आहे. नेपाळमध्ये एकही आण्विक प्रकल्प नसताना तेथे युरेनियम का आणले गेले हा प्रश्न उपस्थित होत आहे. या किरणोत्सर्गी पदार्थाची तस्करी भारतातून करण्यात आली असावी असा संशयही व्यक्त होतोय. अत्याधिक सुरक्षा असलेल्या भारताच्या आण्विक प्रकल्पातून कुठल्याही प्रकारे तस्करी करणे शक्य नाही. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारावर काठमांडूच्या बौद्ध क्षेत्रात एका घरावर छापे टाकण्यात आले असता 4 जणांकडून 2.5 किलोग्रॅम युरेनियम-238 आढळले आहे. युरेनियम तस्करीच्या प्रकरणी पहिल्यांदाच अटकेची कारवाई झाली असावी असे पोलिसांनी म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी 2 जण 20 वर्षीय तर दोघे 40 वर्षीय आहेत. त्यांच्या विरोधात नेपाळमध्ये विस्फोटक पदार्थ अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तस्करीचा उद्देश काय?
नेपाळमध्ये या धातूचा वापर करता येईल, अशाप्रकारचेही एक तांत्रिक-औद्योगिक केंद्र नाही. अशा स्थितीत या घातक किरणोत्सर्गी पदार्थाच्या तस्करीच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होतो. आण्विक प्रकल्प असता तरीही तेथील सरकारला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माध्यमातून स्वतःसाठी याची खरेदी करता आली असती.
अणुबाँबसाठी वापर
युरेनियम-238 नैसर्गिक स्वरुपात प्राप्त होणारा धातू आहे. याचा वापर संपृक्तीकरण केल्यावर वीजनिर्मिती आणि अण्वस्त्रांकरता केला जातो. नैसर्गिक स्वरुपात प्राप्त युरेनियममध्ये युरेनियम-235 चे प्रमाण केवळ 0.07 टक्के असते. उर्वरित 99.284 टक्के युरेनियम-238 असते. पण सर्वसामान्यांकडे अणुबॉम्ब किंवा स्वतःसाठी संयंत्र स्थापन करण्याचे कुठलेच तंत्रज्ञान नसते.
भारतातून आणल्याचा दावा
काही लोक युरेनियमचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. अटकेतील आरोपींपैकी एकाने त्याच्या सासऱयाने 20 वर्षांपूर्वी भारतातून ही सामग्री आणल्याचे सांगितले आहे. संबंधित व्यक्तीने एका युरेनियम खाणीत काम केले होते. पोलीस या दाव्याची पडताळणी करून पाहत आहेत.