गेल्या आठवडय़ात जागतिक कविता दिन साजरा झाला तेव्हा आरामखुर्चीत बसून पेपरातल्या बातम्या वाचता वाचता आम्ही कविता रचण्याचा प्रयत्न केला. नेमेचि येते निवडणूक, जाणा नेत्यांचे कवतुक. एवढं लिहिलं आणि लेखणीला थकवा (लेखन-लकवा आला असं कोण म्हणतोय रे?) आला. डोळे मिटून आम्ही यमक आणि पुढच्या ओळी जुळवण्याचा असफल प्रयत्न केला.
चिंतन करता करता गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा सखुबाई आली होती. सवयीप्रमाणे तिने स्वतःचा मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि झाडलोट करत होती. तिला बघून मनात अपार करुणा दाटून आली. आपल्याकडे निवडणुका होतात तेव्हा ती रजेवर जाते. सर्वपक्ष समभाव धर्माला अनुसरून प्रत्येक पक्षाच्या प्रचार फेरीत, सभेत सहभागी होते. दिवसाचं मानधन, वडापावचा नाष्टा आणि पुरीभाजीचं जेवण घेतलं की कोणाच्याही विजयाच्या घोषणा देऊ शकते. निवडणुकीच्या काळात आमच्यावर धुणीभांडी करण्याचा भार पडतो. ती सवय लॉकडाऊनमध्ये कामाला आली ही बाब अलाहिदा. पण त्या दिवशी वर्तमानपत्रे वाचता वाचता लक्षात आलं होतं की सखुबाईवर नियतीने मोठा अन्याय केलाय. त्याचे तपशील तिला सांगून टाकण्यासाठी मी आवाज दिला.
“सखुबाई?’’
“काय भाऊ?’’
“तुझं नशीब काय बरोबर नाही.’’
“का हो? तुम्ही माझा पगार कमी करताय का?’’
“नाही, तसं नाही. पण आज पेपर वाचले तेव्हा मनात विचार आला, तू महाराष्ट्रात उगीच जन्म घेतलास.’’
“माझं पण तेच म्हणणं हाय. परवा मी केबलवर बघितलं. फॉरेनला धुणीभांडी, झाडलोट करणाऱया बाया मालदार असतात. त्यांना दाबून पगार भेटतो. त्या कामावर जाताना पण कारमधून जातात.’’
“मी त्याबद्दल बोलत नव्हतो. तू महाराष्ट्राऐवजी बंगाल किंवा तामिळनाडूत जन्मली असती तर तुझी चंगळ झाली असती.’’
“तिकडं पण जास्त पगार असतात काय?’’
“तिकडं निवडणुका असतात त्या आपल्यापेक्षा जोरदार असतात. तू तिकडं जन्मली असतीस तर यंदाच्या निवडणुकीत तुला कमीत कमी दोन नवी घरं फुकट मिळाली असती. शिवाय तू टीव्हीवर झळकली असतीस आणि ऑल इंडिया फेमस झाली असतीस.’’
“अगं बाई, ते कसं काय हो भाऊ?’’
“तिकडं एखादी गरीब मुलगी आपल्या झोपडीसमोर उभी राहते. मग तिचे फोटो काढतात आणि तिला उमेदवार लोक नवीन घर देतात. त्या घरासमोर फोटो काढून टीव्ही वर दाखवतात.’’
“ह्या, ते सगळं बंडल हाय, भाऊ. मी व्हॉट्सअपवर त्या बायांच्या मुलाखती बघितल्या. सगळय़ा उमेदवारांनी खोटय़ा जाहिराती दिल्यात. त्यापेक्षा आपले उमेदवार लई चांगले. कोणत्या का पार्टीचे असेनात. दिवसभर धावपळ केली की एक नाष्टा, एक जेवण आणि पाचशेची नोट नक्की मिळते.’’
मी बघतच राहिलो.