भांडुरा नाला-म्हादई नदीवर दोन लोखंडी पूल उभारण्याची मंजूर योजनाही रखडली
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नेरसा-गवाळी मार्गावरील भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवर दोन लोखंडी पूल मंजूर करण्यात आले होते. यासाठी 80 लाखांचा निधीही मंजूर झाला आहे. पण या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यासाठी अद्याप वनखात्याकडून हिरवा कंदील मिळाला नाही. यामुळे लोखंडी पूल बांधण्याचा प्रस्ताव रखडला आहे.
नेरसा ते गवाळी अंतर जवळपास 18 कि. मी. आहे. या रस्त्यावर भांडुरा नाला व म्हादई नदी आहे. दरवर्षी पावसाळय़ात या दोन्ही ठिकाणी रहिवासी लाकडी साकव उभारून आपली सोय करून घेतात. त्यामुळे पास्टोली, कोंगळा, गवाळीमधील जनता पायपीट करून तालुक्याच्या ठिकाणी येतात. अनेक वेळा त्या दोन्ही ठिकाणचे साकव पाण्याच्या प्रवाहामुळे मोडल्याने त्या तिन्ही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. यामुळे त्या दोन्ही ठिकाणी पूल बांधावा, अशी जनतेची बऱयाच वर्षांची मागणी आहे.
जिल्हाधिकारी-वनाधिकाऱयांचा प्रस्ताव आठ वर्षांपासून बासनात
मध्यंतरी ऐन पावसाळय़ातच लाकडी साकव मोडल्याने त्या तिन्ही गावांची स्थिती अंदमान, निकोबार बेटांप्रमाणे झाली होती. या संदर्भात राज्यातील विविध वृत्तपत्रांतून त्या तिन्ही गावांतील समस्यांबद्दल वृत्त प्रसिद्ध करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. राज्य शासनाने याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा वनाधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी जयराम व तत्कालीन जिल्हा वनाधिकारी अंबाडी माधव यांनी पाहणी करून तिन्ही गावांना जाणाऱया रस्त्यासाठी कोंगळा नाला तसेच म्हादई नदीवर पूल बांधण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. याला आता 8 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी पूल बांधण्याची योजना अंमलात येऊ शकली नाही. सहा वर्षांपूर्वी निजद नेते नासीर बागवान यांनी म्हादई नदीवर लोखंडी पूल बांधून तिन्ही गावांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. पण दोन वर्षांपूर्वीच्या महापुरात लोखंडी पूलही वाहून गेल्याने पावसाळय़ात संपर्काची मोठी समस्या निर्माण होते.
गेल्या वर्षी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी याची दखल घेऊन भांडुरा नाल्यावर तसेच म्हादई नदीवर लोखंडी पूल बांधण्यासाठी 80 लाखांचे अनुदान मंजूर करून आणले. त्या दोन्ही पुलांच्या आराखडय़ाला मंजुरी मिळून निविदा प्रक्रियाही सुरू झाली. यासाठी वनखात्याकडून आवश्यक परवानगीची अद्याप पूर्तता झालेली नाही. वनखात्याने या संदर्भात वेळकाढूपणा सुरू ठेवल्याने अद्याप दोन्ही पुलांच्या उभारणीला सुरुवात होऊ शकली नाही.
वनखात्याने गांभीर्याने दखल घ्यावी
आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत वनखात्याची परवानगी मिळवून दोन्ही पुलांची उभारणी पावसाळय़ापूर्वी होईल की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. वास्तविक नेरसाहून गवळीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यात कोणतेच झाड आड येत नाही. यामुळे उन्हाळय़ात वाहनांची ये-जा सुरू असते. पण पावसाळा सुरू झाला की भांडुरा नाला तसेच म्हादई नदीला पूर येऊन रस्त्याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवरील लोखंडी पूल उभारणीमध्ये येणारा अडथळा दूर करावा, अशी गवाळी, पास्टोली, कोंगळा भागातील जनतेची मागणी आहे.