रस्ता खराब झाल्याने नागरिकांमध्ये संताप : दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील बहुतांश भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय चोवीसतास होत आहे. नेहरुनगर तिसरा क्रॉस येथील रस्त्यावर चोवीसतास पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीला गळती लागली असून याची दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.
जलशयातील पाणीसाठा संपल्यानंतर शहरात पाणीसमस्या निर्माण झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तेंड द्यावे लागते. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. मात्र सध्या शहर आणि उपनगरात लागलेल्या गळतीमुळे मोठय़ाप्रमाणात पाणी वाया जात असून चोवीसतास पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीला नेहरुनगर तिसरा क्रॉस येथे गळती लागल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डय़ात दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडत आहेत. तिसरा क्रॉस येथे गळती लागली असल्याने पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार करण्यात आली होती. पण याकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाला पाण्याचे गांभीर्य किती आहे? याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
रस्त्यावरून सतत पाणी वाहून रस्ताच खराब
जलवाहिनीद्वारे चोवीसतास पाणीपुरवठा केला जातो. यामुळे गळतीद्वारेदेखील गेल्या कित्येक महिन्यांपासून चोवीसतास पाणी वाहत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांची वर्दळ असते. एपीएमसी रोड ते रुग्णालय मार्गाला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा नेहमी असते. पण सध्या गळतीमुळे सतत पाणी वाहत असल्याने रस्ता वाहून गेला आहे. निर्माण झालेल्या खड्डय़ात वाहने अडकून पडत आहेत. रस्त्यावरून सतत पाणी वाहून रस्ताच खराब झाला आहे. वाहनधारकांसह पादचाऱयांना चालत जाणे मुश्कील बनले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पाणी समस्या असल्याने गळती निवारण करण्याची गरज आहे. पण चोवीसतास गळती असतानादेखील पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. पाणीटंचाईच्या काळात जलवाहिनीची गळती काढण्याकडे कानाडोळा चालविला असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गळती निवारणासह रस्ता दुरुस्तीची मागणी
केएलई रुग्णालयाला जाणाऱया रस्त्यापासून एपीएमसी रोडला जोडणाऱया नेहरुनगरमधील रस्ता विकासापासून वंचित आहे. हा रस्ता वाहनधारक आणि नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. पण रस्त्याचा विकास करण्यास महापालिका प्रशासनाने साफ कानाडोळा केला आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. रस्त्याचा विकास करण्याची मागणी वारंवार करूनही दुर्लक्षित आहे. परिणामी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचा फटका नागरिकांसह वाहनधारकांना मोठय़ाप्रमाणात बसत आहे. यामुळे रस्ता करण्याकडे महापालिकेच्या अभियंत्यांनी कानाडोळा केला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. येथील गळती निवारणासह रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.